लॉकडाऊन भीतीने विवाह नोंदणी संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:56 AM2021-02-26T04:56:20+5:302021-02-26T04:56:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दुसरा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने नोंदणी पद्धतीने विवाह करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दुसरा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने नोंदणी पद्धतीने विवाह करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात विवाहेच्छुक जोडप्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यात गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आल्याने या दिवसाचा मुहूर्त साधून ३८ जोडपी विवाहबंधनात अडकली असल्याचे कार्यालयाने सांगितले.
लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा, असा इशारा दिल्यानंतर सामान्यांना पुन्हा एकदा लॉकडाऊनची धास्ती वाटू लागली आहे. ती घेतली नाही तर लॉकडाऊन पुन्हा लावावा लागेल आणि यावेळी (अंमलबजावणी) अवघड असेल, असा इशारा ठाकरे यांनी जनतेला दिला आहे. येत्या काही दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे. लॉकडाऊनचे निर्बंध मात्र विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर आले आहेत. तसेच, कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. लॉकडाऊन झाल्यास गेल्यावर्षीप्रमाणे विवाह सोहळे रद्द करावे लागतील अथवा पुढे ढकलावे लागतील. त्यामुळे आता नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे जोडप्यांचा कल दिसून येत आहे. २२ फेब्रुवारी रोजी ४९, २३ फेब्रुवारी रोजी २२, २४ फेब्रुवारी रोजी १४ तर २५ फेब्रुवारी रोजी ३८ जोडपी विवाह बंधनात अडकली.
-----------------
लॉकडाऊनची भीती असल्याने ही संख्या वाढत असावी. तसेच, गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असल्याने विवाह नोंदणीची संख्या दोन दिवसांच्या तुलनेत अधिक होती.
- अनिल यादव, विवाह निबंधक
----------------------------------
गुरुवारी पुष्य नक्षत्रात चंद्र असेल तर तो दिवस गुरुपुष्यामृत योग मानला जातो. यावर्षी २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर, २५ नोव्हेंबर या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुवारचा दिवस हा सोने खरेदीसाठी महत्त्वाचा होता. या दिवशी विवाह मुहूर्त नव्हता. परंतु, हा शुभ दिन असल्याने कदाचित या दिवसाचा मुहूर्त जोडप्यांनी विवाहासाठी साधला असावा.
- दा. कृ. सोमण, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ