परिवहनचा कारभार सुधारण्यासाठी कार्यशाळा नाईट शिफ्ट मध्येही सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:19 IST2018-07-21T17:17:37+5:302018-07-21T17:19:21+5:30
ठाणे परिवहनची सेवा सुधरविण्यासाठी कार्यशाळेचा कारभार आता रात्रीच्या शिफ्टमध्ये देखील सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे आता दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसेस ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

परिवहनचा कारभार सुधारण्यासाठी कार्यशाळा नाईट शिफ्ट मध्येही सुरु
ठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या बाबत लेखापरिक्षण अहवालात आक्षेप आल्यानंतर आता परिवहन प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रात्रीचा दिवस करुन नादुरुस्त बसेस रस्त्यावर जास्तीच जास्त कशा काढता येतील यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. बसेस दुरुस्तीसाठी आता रात्रीची शिफ्टही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळेच शनिवारी कळवा आणि वागळे आगारातून दुप्पट बसेस रस्त्यावर धावल्या आहेत.
ठाणे परिवहन सेवेचा २०१५-१६ चा लेखापरिक्षण अहवाल नुकताच सादर झाला. यामध्ये तब्बल ४३ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या आक्षेपांच्या अनुषगांने सदस्यांनी परिवहनच्या बेसस रस्त्यावर अगदी नगन्य प्रमाणात धावत असल्याची जोरदार टिका केली होती. तर जीसीसी कॉंट्रेक्टच्या अधिक बसेस धावत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यामुळे परिवहनमधील कर्मचारीसुध्दा बसून असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी या सर्वांची दखल घेत परिवहन सेवा सुधारविण्यासाठी पुन्हा हालचाली सुरु केल्या आहेत. उत्पन्न आणि खर्च यामधील ताळमेळ बसविण्यासाठी प्रयत्न सुरु असतांनाच, जास्तीस जास्त बसेस रस्त्यावर कशा उतरविता येतील यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.
यापूर्वी बसेसची दुरुस्ती ही केवळ सांयकाळपर्यंतच केली जात होती. त्यामुळे सांयकाळ नंतर येणाऱ्या नादुरुस्त बसेस सकाळपर्यंत दुरुस्तीसाठी डेपोत पडून असायच्या. त्यामुळे सकाळी कार्यशाळेतील कर्मचारी आल्यानंतर दुपार पर्यंत या बसेस दुरुस्त होऊन रस्त्यावर उतरविल्या जात होत्या. त्यामुळे रस्त्यावर बसेस धावण्याचे प्रमाण हे कमी झाल्याचे दिसून येत होते. परंतु आता रात्रीची शिफ्ट सुध्दा कळवा आणि वागळे आगारात सुरु करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली. त्यामुळे सांयकाळी दुरुस्तीसाठी येणाºया बसेस सकाळपर्यंत दुरुस्त होऊन रस्त्यावर धावत आहेत. यामुळे शनिवारी वागळे आगारातून ६९ आणि कळवा आगारातून २५ बसेस रस्त्यावर धावल्याची माहिती त्यांनी दिली. अजूनही इतर प्रकारचे बदल करण्याचे प्रस्तावित असून येत्या काळात यापेक्षाही अधिकच्या बसेस रस्त्यावर उतरविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.