भांडणाच्या रागातूनच मुलीचे केले अपहरण; घातापाताचा हाेता उद्देश
By जितेंद्र कालेकर | Updated: June 26, 2025 21:05 IST2025-06-26T21:04:59+5:302025-06-26T21:05:11+5:30
आरोपी रंजीत याची कबुली.

भांडणाच्या रागातूनच मुलीचे केले अपहरण; घातापाताचा हाेता उद्देश
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बदलापूरमधील साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण तिच्या कुटुंबाशी झालेल्या वादातूनच केल्याची कबुली आरोपी रंजीत धुर्वे (२६) याने दिली. पोलिसांनी २४ तासांत त्याच्या मुसक्या मध्य प्रदेशात आवळल्या, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. तिचा घातपात करण्याचाही इरादा हाेता, असेही त्याने पोलिसांना सांगितले.
साडेचार वर्षांच्या मुलीचे वाईट हेतूने रंजीतने अपहरण केल्याची तक्रार बदलापूर पश्चिम पाेलिस ठाण्यात २४ जून राेजी दाखल झाली हाेती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे समांतर तपासासाठी हे प्रकरण साेपविले हाेते. उल्हासनगरचे पाेलिस उपायुक्त सचिन गाेरे आणि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासात रिक्षातून या मुलीला रेल्वे स्टेशनच्या दिशेने नेल्याचे सीसीटीव्हीद्वारे गेल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याच आधारे पथकाने मध्य प्रदेशातून २५ जून राेजी सायंकाळी रंजीतला ताब्यात घेतले. आदल्या दिवशी या मुलीच्या कुटुंबीयांशी त्याचा वाद झाला हाेता. याच रागातून त्याने मुलीला चाॅकलेटचे अमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची कबुली दिली. रंजीत हा बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करतो. त्याच भागात हे कुटुंबीय राहते.
वर्षभरापूर्वी बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलीला सुखरुपपणे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करणे आणि आराेपीला अटक करणे हे पाेलिसांसमाेर माेठे आव्हान हाेते. यातील आराेपीला अटक केली असून यात त्याचा आणखी काय उद्देश हाेता का? याचाही तपास करण्यात येत आहे.
अमरसिंह जधव, पाेलिस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर