मृत्यूशी झुंज संपल्यानंतर दफनविधीसाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:43+5:302021-04-18T04:39:43+5:30
कल्याण : कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोविड टेस्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आली. कोरोनामुळे त्याच्या जगण्याची लढाई संपली होती. ...
कल्याण : कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोविड टेस्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आली. कोरोनामुळे त्याच्या जगण्याची लढाई संपली होती. मात्र, त्याच्या दफनविधीसाठी त्याच्या कुटुंबीयांना वणवण करावी लागली. अखेर, शहाड येथील एका दफनभूमीने त्याच्या मृतदेहावर दफनविधी करण्यास तयारी दर्शविली. त्याच्या मृत्यूचे दु:ख अनावर झालेल्या त्याच्या पत्नी व मुलाला या घटनेमुळे अश्रू अधिकच अनावर झाले होते.
वालधुनी परिसरात राहणाऱ्या या व्यक्तीला किडनीचा आजार होता. त्याला रात्री खूप त्रास सुरू झाला. त्याच्या पत्नीने त्याला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी त्याला दाखल करून घेण्यापूर्वी त्या व्यक्तीची ॲण्टिजेन टेस्ट करण्यात आली. यादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या पत्नीने त्यांचे शेजारी नासीर शेख यांना मदतीस बोलाविले. मृतदेह घेऊन रुग्णवाहिकाचालक स्मशानभूमीत गेला. मात्र, त्यांच्या नंतर लक्षात आले की, मृत व्यक्ती ही मुस्लिम धर्मीय आहे. तिच्यावर अग्निसंस्कार होऊ शकत नाहीत. त्यासाठी दफनभूमीत नेले पाहिजे. त्याने गोंधळलेल्या परिस्थितीत मृतदेह पुन्हा रुक्मिणीबाई रुग्णालयात आणला. त्याचा दफनविधी न झाल्याने सकाळी त्याचे शेजारी नासीर शेख व अन्य लोक पोहाेचले. मृतदेह घेऊन शेजारी तीन ते चार कबरस्तान फिरले. त्यावेळी कबरस्तानात काम करणाऱ्यांनी अन्य ठिकाणी न्या, असे सांगितले. शेजारी त्याचा मृतदेह दफनविधीसाठी घेऊन फिरत होते. दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने मृतदेह पुन्हा रुक्मिणीबाई रुग्णालयात आणला. अखेरीस शहाड येथील कबरस्तानने दफनविधी करण्यास तयारी दर्शविली. तेव्हा कुठे शेजारी आणि मृताच्या पत्नी, मुलाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, त्यांची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली होती. मरणानंतरही त्याच्या कुटुंबीयांना या यातना सहन कराव्या लागल्या. सामान्य माणसाला जीवन जगत असताना अनेक ठिकाणी कठीण परिस्थितीचा सामना करीत वणवण करावी लागते. मृत्यूनंतरही त्याची वणवण संपत नाही. हे एक विदारक चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.
साेयीसुविधांअभावी रुग्णांचे हाल
कल्याण-डोंबिवलीत रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजनची कमतरता आहे. दोन शवदाहिन्या बंद आहेत. जगण्यासाठी आरोग्याच्या सोयीसुविधा अपुऱ्या पडत असताना दफनविधीसाठी त्रास सहन करावा लागत आहे.
फोटो-कल्याण-मृतदेह
-----------------