लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 08:18 IST2025-06-07T08:16:50+5:302025-06-07T08:18:22+5:30

विरोधक कमकुवत झाल्याचाही पुनरुच्चार

Fight not with the opposition, but with allies; BJP workshop theme; Claims of increased strength | लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपले विरोधक कमकुवत झाल्याने आपली लढाई ही विरोधकांशी नसून, प्रतिस्पर्धी असलेल्या मित्रपक्षांबरोबर असल्याचा सूर ठाण्यात भाजपच्या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांनी लावला. ठाण्यासह कोकणपट्ट्यात भाजपचे दीड कोटी सदस्य नोंदणी अभियान राबविले आहे. त्यामुळे या पट्ट्यात भाजपची ताकद मोठी असून, स्वबळाच्या तयारीला लागा, असा अप्रत्यक्ष संदेश बैठकीत नेत्यांनी दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

ठाण्यातील रेमंड येथील भाजप कार्यालयात ठाण्यासह कोकणपट्ट्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, माधवी नाईक, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मागील काही वर्षांत ठाण्यासह कोकणपट्ट्यात भाजपची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेपासून ते लोकसभेपर्यंत भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळू शकते. यापूर्वी मिळालेले यश टिकवून ठेवताना वाढवण्यासाठी काम करा, असा सल्ला चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता आपले कुणी जुळे भाऊ नाही, तर भाजप हाच मोठा भाऊ असल्याचा सूर नेत्यांंनी आळवल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.  

ठाण्यात भाजपने आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. बैठकीत स्थानिकांनी याबाबत भूमिका विशद केली. भाजपच्या वाढत्या संख्याबळाची धास्ती मित्रपक्षांनी अधिक घेतली. 

मित्रपक्षांचा डाव ओळखा

भाजपच्या संख्याबळाला लगाम घालण्यासाठी काही मित्रपक्षांनी अन्य पक्षांतील इच्छुकांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे.  या आघाडीवर लक्ष देण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली. सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपची ताकद कोकणपट्ट्यात वाढल्याचा दावा करीत स्वबळावर लढलेच पाहिजे, असा आग्रह धरला.

‘सरकारची कामे जनतेपर्यंत नेणार’

येत्या ९ तारखेपासून भाजपच्या वतीने ‘संकल्प से सिद्धी तक’ या कार्यक्रमांतून गेल्या ११ वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने केलेली कामे आणि राज्यात महायुतीच्या माध्यमातून झालेली कामे जनतेपर्यंत नेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यात रेमंड येथील भाजप कार्यालयात आयोजित कार्यशाळेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या उपक्रमाचा शुभारंभ करतील, असे ते म्हणाले.

भाजपमध्ये संघटनात्मक पद्धतीने काम करण्याची परंपरा आहे, येथे वैयक्तिक मताला किंमत नाही, टीआरपीसाठी बोलणे सोपे असते. आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की, महायुतीत लढायच्या याचा निर्णय महायुतीमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे घेणार आहेत. फडणवीस हे आम्हाला जे सांगतील त्यानुसार आम्ही पुढे काम करू. आम्ही मोठे भाऊ आहोत हे खरे आहे. मात्र येणाऱ्या काळात काय होणार, हे काळच ठरवणार आहे.
-रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष, भाजप

Web Title: Fight not with the opposition, but with allies; BJP workshop theme; Claims of increased strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.