भिवंडीतील भारनियमन झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:24 IST2019-04-21T02:23:00+5:302019-04-21T02:24:05+5:30

वीजचोरीचे प्रमाण १५ टक्क्यांवर आले

Failure to be frozen in the future | भिवंडीतील भारनियमन झाले बंद

भिवंडीतील भारनियमन झाले बंद

भिवंडी : येथील वीजचोरांवर टोरंट कंपनीने गुन्हे दाखल केल्यामुळे प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्यांना चांगली सेवा मिळू लागली. ग्राहकांनीही बिल भरण्यास सुरुवात केल्यामुळे आज महावितरणच्या ‘ड’ श्रेणीतील भिवंडी शहर ‘ब’ श्रेणीत आले. परिणामी, येथील वीजचोरीचे प्रमाण १५ टक्क्यांवर येत भारनियमन बंद झाले आहे.

शहरातील भारनियमन बंद झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून येथील विकासालाही चालना मिळाली आहे. पॉवरलूमलाही भारनियमन बंद झाल्याचा फायदा झाला आहे. पूर्वी वीजचोरीही होत होती. गुन्हे दाखल होऊनही परिस्थितीत फरक पडला नव्हता. अशा परिस्थितीत महावितरणने भिवंडीची जबाबदारी टोरंट कंपनीवर सोपवली. कंपनीने वितरणव्यवस्थेत सुधारणा करताना सदोष मीटर प्रामुख्याने बदलले. वीजचोरांवर कारवाईचा बडगा उगारला. ग्राहकसेवा केंद्रांबरोबरच तक्रारींसाठी कॉल सेंटर सुरू केली. एसएमएसवर बिलांची माहिती मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. नवीन जोडणीही सात दिवसांत मिळू लागली आहेत.

वीजचोरी करणारे आणि बिल न भरण्याची सवय झालेल्यांचे धाबे दणाणले आहे. भिवंडीप्रमाणेच कळवा, मुंब्रा येथेही मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मुंब्रा येथे ७३ कोटी, तर कळवा येथे २० कोटी थकबाकी आहे. येथील नागरिकांना पुरेशी वीज मिळत नसल्याने सरकारने या भागातील वीजवितरणाचे खासगीकरण केले आहे.

टोरंटमुळे वीजपुरवठा सुरळीत झाला. भारनियमन नसल्याने भिवंडीत स्टॅबिलायझर अनिवार्य होते, पण आज कुठेच दिसत नाही.
- नारायण अय्यर, वकील

देखभालीसाठी वीजपुरवठा खंडित होणार असेल, तर एसएमएस केला जातो. यामुळे आम्हाला कामाचे नियोजन करता येते.
- विनोद परमार, संचालक, डॉर्तिक्स पोलीयार्न

टोरंटमुळे कमी बिघाड होतात. येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत.
- रोहिणी गावडे, गृहिणी

Web Title: Failure to be frozen in the future