डोंबिवलीत पोलिसांनी घेतली नागरिकांसमवेत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:18 IST2018-02-15T19:13:28+5:302018-02-15T19:18:39+5:30

डोंबिवली शहरातील कायदा सुव्यस्था सांभाळण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची पोलिस यंत्रणेला चांगली साथ मिळत आहे, यापुढेही ती मिळावी. सामान्य नागरिक हाच तिसरा डोळा म्हणुन कार्यरत असू शकतो, यावर सुरक्षा यंत्रणेचा ठाम विश्वास आहे. कोणतीही अप्रिय घटना घडत असेल तर नागरिकांनी सतर्क व्हावे आणि पोलिस यंत्रणेला सूचित करावे असे आवाहन डोंबिवली सहाय्यक पोलिस उपायुक्त रवींद्र वाडेकर यांनी केले.

   Dombivli police held a meeting with the citizens | डोंबिवलीत पोलिसांनी घेतली नागरिकांसमवेत बैठक

डोंबिवलीत पोलिसांनी घेतली नागरिकांसमवेत बैठक

ठळक मुद्देसामान्य नागरिक हाच तिसरा डोळा - एसीपी रवींद्र वाडेकर जाणल्या सुरक्षेविषयक नागरिकांच्या अपेक्षा

डोंबिवली: शहरातील कायदा सुव्यस्था सांभाळण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची पोलिस यंत्रणेला चांगली साथ मिळत आहे, यापुढेही ती मिळावी. सामान्य नागरिक हाच तिसरा डोळा म्हणुन कार्यरत असू शकतो, यावर सुरक्षा यंत्रणेचा ठाम विश्वास आहे. कोणतीही अप्रिय घटना घडत असेल तर नागरिकांनी सतर्क व्हावे आणि पोलिस यंत्रणेला सूचित करावे असे आवाहन डोंबिवली सहाय्यक पोलिस उपायुक्त रवींद्र वाडेकर यांनी केले.
रामनगर पोलिस ठाण्यात पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी बुधवारी रात्री एका समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भातील संकल्पना, अपेक्षा जाणुन घेतल्या. पोलिसांनीही त्यांना भेडसावणा-या समस्या सांगत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठीही नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणांसह कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी संशयितांवर नजर ठेवावी, त्यांच्या हालचालींचा अंदाज घ्यावा आणि सुरक्षा यंत्रणेला सूचित करावे असे सांगण्यात आले. चो-या, घरफोड्या टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यांसह चोरी होऊ नये यासाठी क्लृप्ती या विषयावर चर्चा झाली. ठिकठिकाणी पोलिस यंत्रणा असते, बीट मार्शल असतात त्यांना सुचना द्याव्यात. पोलिस मित्र बनावे आणि समाज सुरक्षित ठेवावा असे आवाहन नागरिकांमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. अनेकदा शुल्लक कारणावरुन बाचाबाची होते, त्यावेळी नागरिकांनी दक्ष नागरिक बनावे, वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक जाणिवेने चर्चा कराव्यात. तसेच उपद्रवींबाबत पोलिसांना सांगावे, कुठेही अनुचित प्रकार दिसल्यास, सुरु असल्यास त्यावर वेळीच उपाययोजना केल्या तर अपप्रवृत्तीना आळा बसेल असे आवाहन रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार यांनी केले.
वाहतूक कोंडी संदर्भातही एकाच वेळी विशिष्ठ रस्त्यांवर वाहने येतात, गर्दी होते. त्यामुळे कोंडीचा फुगवटा होतो. विशेषत: सुटीच्या दिवसांसह शनिवार-रविवार संध्याकाळच्या वेळेत काही ठराविक भागात कोंडी होते. त्या ठिकाणी नागरिकांनी पुढे यावे, वाहतूक नियंत्रणासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्या विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी सांगितले. त्यांच्या आवहनाला नागरिकांनी दाद देत जसा वेळ मिळेल तसे नक्की सहकार्य केले जाईल असे आश्वस्थ केले.
याखेरिज विविध सोसायट्यांनी, दुकानदारांनी सीसी कॅमेरे, सक्षम सुरक्षा रक्षक नेमल्यास सध्याच्या पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होईल असे नव्हे तर सुरक्षा विषयक जनजागृती आपोआप वाढेल. त्यामुळे भविष्यात होणा-या दुर्घटना टळू शकतील. त्यासाठी नागरिकांनी एकत्र येत जास्तीत जास्त सुरक्षा विषयक उपाययोजना अवलंबाव्यात असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले. तसेच अशी समन्वय बैठक तीन महिन्यातून व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली, त्याचा नक्की सकारात्मक विचार केला जाईल असेही पोलिसांनी सांगितले. जेष्ठ नागरिकांसह, महिला, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आवर्जून या बैठकीला उपस्थित होते.

Web Title:    Dombivli police held a meeting with the citizens