Coronavirus: कोरोनाच्या नियमांना कात्रजचा घाट; ठाणे शहरात कडक लॉकडाऊनचीच गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 02:31 IST2021-03-22T02:31:09+5:302021-03-22T02:31:38+5:30
गेल्यावर्षी नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली होती. पण, आता किती दिवस घाबरून घरात बसायचे, असा विचार करून सामान्य माणूस घराबाहेर पडू लागला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक चणचण जाणवू लागल्याने घर कसे चालवायचे, अशी चिंता सामान्यांना वाटू लागली. यातूनच नागरिक बिनधास्त फिरत आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. यापार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमांचे पालन कितपत होते, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.

Coronavirus: कोरोनाच्या नियमांना कात्रजचा घाट; ठाणे शहरात कडक लॉकडाऊनचीच गरज
अजित मांडके/नितीन पंडित
ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत आजही गर्दी दिसत आहे. रिक्षांमध्ये दोनच प्रवासी घेण्याचा नियम असतानाही तीन ते पाच प्रवासी बसवले जात आहेत. परिवहनच्या बसमध्येही नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातल्या त्यात हॉटेलचालक मात्र रात्री साडेअकरा वाजता शटर डाऊन करुन पालिकेला सहकार्य करत असल्याचे दिसत आहे. परंतु येऊर, घोडबंदर भागातील ढाबे रात्री एक ते दोनपर्यंत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिका हद्दीत मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसून आले आहेत. या रुग्णांसाठी पालिकेने कोविड सेंटरमध्ये ४ हजार २२१ बेड आरक्षित केले आहेत. त्यानुसार मागील १९ दिवसांत शहरात ५ हजार ८८० रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत शहरात ३०० ते ५०० रुग्ण दिवसाला आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने निर्बंध आणखी कडक करण्यास सुरुवात केली आहे. ठाणेकरांना मात्र याची तमाच नसल्याचे पाहणीत दिसून आले. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. रिक्षातून दोनच प्रवासी नेण्याचे बंधन असताना तीन प्रवासी घेऊन जातात, तर शेअर रिक्षांवर जास्तीचे प्रवासी नेल्यास कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या रिक्षांमध्ये चार ते पाच प्रवासी आजही वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत नेले जात आहेत. दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून एका सीटवर एक प्रवासी असे स्पष्ट करण्यात आले असतानाही बस भरून जाताना दिसतात. इतरांचे सोडा, महानगरपालिकेची व्यवस्थाच नियमांचे पालन करत नसेल, तर त्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
भिवंडी
काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या कोरोनाने मार्च महिन्यात डोके वर काढायला सुरुवात केली आहे. भिवंडीतही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात आटोक्यात असलेला कोरोना हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत रोज पाच ते सात असलेली रुग्णसंख्या मार्च महिन्यात दुपटीने वाढायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात भिवंडी शहरातील रुग्णसंख्या १६६ वर पोहोचली, तर रुग्ण दुपटीचा कालावधीही २०५ दिवसांवर आला आहे.
इतर शहरांच्या तुलनेने भिवंडीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात आली असली तरी भिवंडीकरांकडून कोरोना नियमांचे फारसे पालन होताना दिसत नाही हे वास्तव आहे. विशेष म्हणजे पोलीस व मनपाच्या दंडवसुली मोहिमेमुळे नागरिक कोरोना नियमांचे पालन करत असून शहरातील सार्वजनिक उत्सव व लग्न समारंभात फारशी गर्दी पाहायला मिळत नाही. मात्र शहरात असलेल्या सर्वच भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करताना दिसतात.
शहरातील काही हॉटेलमध्ये कोविड नियमांचे पालन केले जात असले तरी शहराजवळ व महामार्गांवर असलेल्या ढाब्यांवर मात्र रात्री गर्दी दिसते. त्यातही काही ढाब्यांवार मोकळी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मालकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे, तर काही ठिकाणी तीनतेरा वाजलेले आहेत.