CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:58 AM2020-06-26T00:58:15+5:302020-06-26T00:58:28+5:30

एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.

CoronaVirus: Corona patients doubled in ten days | CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

Next

प्रशांत माने
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा ९ ते १० दिवसांचा आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. मागील १५ दिवसांत २,६६० रुग्ण सापडले असून, ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.
लॉकडाऊन असेपर्यंत केडीएमसी हद्दीत रुग्णांचे प्रमाण मर्यादित होते. मात्र, ८ जूनला अनलॉक झाल्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठाणे शहरात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी १० वरून ३० दिवसांवर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के असले तरी, रुग्ण दुपटीचा कालावाधी ९ ते १० दिवसांचा आहे.
केडीएमसी हद्दीत ९ जूनपर्यंत १,५६२ रुग्ण होते. तर, यातील ४६ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, मागील १५ दिवसांत रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. २,६६० रुग्णांमधील ७० ते ८० टक्के तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या तरुणांचा वयोगट ३० ते ४५ वर्षांदरम्यानचा आहे. तर, उर्वरित रुग्णांमध्ये ६२ ते ९२ वयोगटांतील व्यक्ती असून, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, डायलिसिस, किडनीचे आजार आहेत.
दरम्यान, बुधवारपर्यंत कल्याण पश्चिमेत सर्वाधिक १,३१७, पूर्वेत १,०५८, डोंबिवली पूर्वेत ९१५, पश्चिमेत ५८७, मांडा-टिटवाळा-मोहने ३०७, तर, पिसवली भागात आठ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या ४,१९२ पर्यंत पोहोचली असून, यातील ८५ जणांचा बळी गेला आहे. तर, १,६८८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर, सध्या २,४१९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात दररोज ५० ते ७० पर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र, अनलॉक झाल्यानंतर प्रतिदिन किमान ७२ ते कमाल २५६ पर्यंत रुग्ण सापडले आहेत.
अनलॉक १ मध्ये नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. सुरुवातीला केडीएमसी हद्दीतून मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणाऱ्यांकडून कोरोना संक्रमित होत असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले होते. परंतु, आता शहरातील सर्वच भागांत कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी तसेच कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन केले पाहिजे. आपण प्रत्येक जण आता कोरोना योद्धा आहोत, ही भावना आत्मसात करून खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
>कोरोना चाचणीच्या प्रमाणात वाढ
केडीएमसीने कल्याण-डोंबिवलीत घरोघरी ताप सर्वेक्षण तसेच कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण वाढवले आहे.
सध्या प्रतिदिन ४०० ते ४५० चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र, चाचणीचा अहवाल उशिराने मिळत असल्याचीही संशयित रुग्णांची तक्रार आहे.
खाजगी लॅबमध्ये करणाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने अहवालास विलंब होत आहे.
कोरोनाची चाचणी दिल्यानंतर अहवाल मिळेपर्यंत त्यांनी घरातच क्वारंटाइन होणे महत्त्वाचे आहे.
अशा व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी वावरू नये, असे आवाहन केडीएमसीने केले आहे. नागरिकांनी नियमही पाळावे.
>‘ते’ काम अंतिम टप्प्यात : रुग्णालयांत खाटांअभावी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. याप्रकरणी लोकप्रतिनिधींकडून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने डोंबिवलीतील क्रीडासंकुलात २०० बेड उभारणीचे काम सुरू केले आहे. ते काम ९५ टक्के पूर्ण झाले. लवकरच तेथे रुग्णांवर उपचार सुरू होतील. दरम्यान, कल्याणमधील फडके मैदानातही ५५० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, अद्याप तेथे कोणतेही काम सुरू झालेले नाही.

Web Title: CoronaVirus: Corona patients doubled in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.