उल्हासनगर महापालिकेत 'लेटलतिफां'ना आयुक्तांचा दणका ३५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:34 IST2026-02-09T22:33:54+5:302026-02-09T22:34:55+5:30
उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती.

उल्हासनगर महापालिकेत 'लेटलतिफां'ना आयुक्तांचा दणका ३५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
उल्हासनगर: महापालिका म्हणजे 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी समजूत करून घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी जोरदार दणका दिला आहे. सोमवारी सकाळी कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या ३५ कर्मचाऱ्यांची हजेरी घेत, आयुक्तांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन का कापले जाऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर, आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सोमवारी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली. सोमवारी सकाळी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना थांबाविण्यात आले. अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी उशिरा आलेल्या ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली. या सर्वांना नोटीस बजावण्यात आली असून, २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास एका दिवसाचा पगार कपात करण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त गवस यांनी दिले आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांची 'दादागिरी' रडारवर
महापालिकेत रिक्त पदांमुळे मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी राजकीय वरदहस्त असलेले किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. हे कर्मचारी वेळेचे पालन करत नसल्याने महापालिकेच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. आता आयुक्तांनी या 'दादागिरी'वरही वचक निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
आयुक्ताचे कौतुक, पण नवीन प्रश्न उपस्थित
आयुक्तांच्या या शिस्तप्रिय भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक होत असतानाच, काही नवीन प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. उशिरा येणाऱ्यांवर कारवाई झाली, मात्र दुपारीच घरचा रस्ता धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन कधी लक्ष देणार? असा प्रश्नही विचारला जात आहे.
वरिष्ठ अधिकारी रडारवर येणार का?
महापालिका वर्ग-१ आणि वर्ग-२ चे अधिकारी, तसेच प्रभारी विभागप्रमुख वेळेत येतात का? याचीही झाडाझडती घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.