कल्याण : विवाहित बहिणीचे परपुरुषाशी असलेल्या अनैतिक संबंधावरून गावात व समाजात बदनामी झाल्याने वडिलांच्या सांगण्यावरून भावंडांनी तिची हत्या केल्याचा प्रकार तपासात उघड झाला. मृत महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवले होते. परंतु, तिच्या कपड्यात सापडलेल्या सीमकार्डवरून तिच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यात कोळसेवाडी पोलिसांना यश आले.
कल्याण रेल्वे यार्डातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तेवीस वर्षीय महिलेचा मृतदेह १ जानेवारीला आढळला होता. तिची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. परंतु, सीमकार्डवरून तपास केला असता तिचे नाव मनिता यादव (रा. मौलानापूर, आजमगढ, उत्तर प्रदेश) आहे. ती घरातून चार दिवसांआधीच निघून गेली आहे. तिचा भाऊ तीर्थराज विक्रोळीत राहत असल्याचे समजले. तसेच ती बेपत्ता झाल्याची तक्रार उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलिसात दाखल झाली होती.
दरम्यान, तीर्थराजच्या कॉल डिटेल्स रेकार्डवरून लोकेशन व कल्याण रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मनिता, भाऊ पप्पू,मनोज, हे कामायनी एक्स्प्रेसमधून ३१ डिसेंबरला पहाटे ३ वाजता कल्याणला उतरल्याचे दिसून आले. पहाटे ४.२१ चे फुटेज तपासले असता फक्त मनोज व तीर्थराज हे फलाटावर परतताना दिसले. मात्र, त्यात मनिता नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तीर्थराजची चौकशी करताच त्याने इतर भावांच्या साथीने मनिताची गळा दाबून हत्या केल्याचे सांगितले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे भासवल्याचे तो म्हणाला.एका भावाला अटकपोलिसांनी या हत्येप्रकरणी तीर्थराज, मनिताचे वडील लौटू यादव, रमाकांत ऊर्फ पप्पू व आतेभाऊ मनोज यादव अशा चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर, तीर्थराजला पोलिसांनी अटक केली आहे.