अंघोळीची गोळी संस्थेचा कल्याण शहरांत खिळेमुक्त झाडं उपक्रम; झाडांना पोस्टर, बॅनरमुक्त करत केला स्वातंत्र्यदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 15:08 IST2020-08-15T15:08:23+5:302020-08-15T15:08:36+5:30
झाडांसंदर्भात असलेलं कायद्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी

अंघोळीची गोळी संस्थेचा कल्याण शहरांत खिळेमुक्त झाडं उपक्रम; झाडांना पोस्टर, बॅनरमुक्त करत केला स्वातंत्र्यदिवस साजरा
डोंबिवली: अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने पाणी बचतीचा आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी पाणी वाचवण्याचे आवाहन नागरिकांना नेहमी करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी संस्था उभारलेली आहे.
पाणी बचतीचे आणि संवर्धनाचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी संस्थेच्या टीम मुंबईतील ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालय येथे जाऊन पाण्याचे महत्व देखील पटवून देत असते. ह्याच अंघोळीच्या गोळीच्या टीमने नुकतेच भारतीय स्वातंत्र्यदिवसांच्या निमित्ताने कल्याण शहरांतील झाडांवरील बॅनर, पोस्टर काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. खिळेमुक्त झाडं संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम राबवला.
गेल्या दोन वर्षभरापासुन हा उपक्रम मुंबई, ठाणे जिल्ह्यातील विविध भागात राबविला जात आहे. वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी यावेळीं केले. पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला.
पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालु आहे असे अंघोळीची गोळी संस्थेचे सचिव अविनाश पाटील यांनी यावेळीं सांगितले.
कल्याण शहरांत राबवण्यात आलेल्या मोहिमेत भुषण राजेशिर्के, चेतन म्हामुणकर, मंगेश तिवारी या युवकांनी सहभाग घेतला. वृक्ष संवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांसोबत आमचा पत्रव्यवहार चालु आहे अशी माहीती यावेळी अविनाश पाटील यांनी सांगितले. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे असेही ते यावेळी म्हणाले. मोहिमेत अनेक झाडांवरील बॅनर, पोस्टर काढण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी झाडांशी मैत्री करणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांची रक्षा करणेही तितकेच आवश्यक आहे असे यावेळीं या युवकांनी सांगितले. आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आनंद झाडांना देखील पोस्टर, बॅनर यांच्यापासून स्वतंत्र करून साजरा करण्यात आल्याचे या युवकांनी सांगितले.