Barvi Dam Water Level today: ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या शहरांसह सर्व कारखान्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण शनिवारी (16 ऑगस्ट) दुपारी ३.२५ वाजता दहीहंडीच्या मुहूर्तावर १०० टक्के भरले आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बारवी धरणाचे एकाच वेळी सात स्वयंचलित दरवाजे उघडल्या गेले. त्यातून प्रारंभी सेकंदाला चार क्युसेस पाण्याचा विसंर्ग नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
बारवी धरण भरण्यास यंदा सात दिवस उशीर
जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्याच्या बदलापूर शहराजवळ असलेले बारवी धरण गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी भरले होते. यंदा पावसाचा जोर कायम असूनही भरण्यासाठी सात दिवस उशीर झाला आहे. मात्र या वर्षी धरण भरण्याला योगायोगाने दहीहंडीचा मुहुर्त साधता आलेला आहे.
धरणात आता ३३९.२० दशलक्ष घनमीटर पाणी साठा होऊन ७२.६० मीटर पाणी पातळीला धरण १०० टक्के भरले आहे. यासाठी धरण परिसरात पडलेल्या पावसासह कान्होळ, ठाकूरवाडी, पाटगांवला आणि खानिवरे या पाणलोटक्षेत्रातील पावसाचे पाणी येऊन धरण भरले आहे.
एमआयडीतील कारखान्यांची पाणी चिंता मिटली
एमआयडीसीच्या मालकीचे असलेले बारवी धरण भरल्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या कळवा, मुंब्रा परिसरसह कल्याण डोंबिवली महापालिकेचा बहुतांशी शहरीभाग, डोंबिवली एमआयडीसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर या महापालिकांसह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसींमधील कारखान्याच्या पाणी पुरवठ्याची समस्या मिटली आहे.