खूप वर्षांनी शांत बसून कविता ऐकल्या...; ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून कवींचे भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:54 IST2026-03-21T12:54:10+5:302026-03-21T12:54:47+5:30
लोकमत साहित्य महोत्सवांतर्गत शुक्रवारी संध्याकाळी कोरम मॉल येथे काव्यसंमेलन झाले. त्यास प्रमुख पाहुणे म्हणून डुंबरे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी ७५व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल लोकमतच्यावतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

खूप वर्षांनी शांत बसून कविता ऐकल्या...; ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून कवींचे भरभरून कौतुक
ठाणे : लोकमत हे केवळ एकमेव वृत्तपत्र आहे, जे मराठी साहित्यासाठी उपक्रम राबविते. साहित्यिकांचा योग्य प्रकारे सन्मान करते. त्यांना मोठे व्यासपीठ देते, लोकमतने साहित्याला ग्लॅमर मिळवून देण्याचे काम केले, असे कौतुकास्पद उद्गार ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी येथे काढले. अभिजात भाषेचा दर्जा देऊन चालत नाही, ती भाषा तेव्हाच रूजते जेव्हा लोकमत समूह आयोजित काव्यसंमेलन, लोकमत साहित्य महोत्सव यांसारख्या कार्यक्रमात साहित्यिक, कवींचा सन्मान करण्यात येतो. आजच्या काव्यसंमेलनात खूप वर्षांनी मला शांत बसून कविता ऐकता आल्या, त्याबद्दल ‘लोकमत’ला धन्यवाद देतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
लोकमत साहित्य महोत्सवांतर्गत शुक्रवारी संध्याकाळी कोरम मॉल येथे काव्यसंमेलन झाले. त्यास प्रमुख पाहुणे म्हणून डुंबरे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी ७५व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल लोकमतच्यावतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
डुंबरे म्हणाले, लोकमत साहित्य महोत्सवाची वेबसाइट तयार होत आहे, याचा आनंद आहे. यानिमित्ताने मराठी साहित्याला मोठे व्यासपीठ मिळेल. साहित्याचे कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचतील. कवींना व्यासपीठ उपलब्ध होईल. आज नवीन तंत्रज्ञान येत आहे. त्याचा साहित्य प्रचार आणि साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी या वेबसाइटच्या माध्यमातून चांगला उपयोग होईल. मोबाइलवर कविता ऐकणे वेगळे आणि कवींचे प्रत्यक्ष सादरीकरण, त्यांच्याकडून लाइव्ह कविता ऐकणे वेगळे. तो वेगळा आनंद असतो, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना प्रा. अशोक बागवे म्हणाले की, लोकमत समुहाने केलेला सत्कार माझ्यासाठी अनपेक्षित आहे. हा माझ्या वयाचा सत्कार नसून साहित्याचा सत्कार आहे. १० मार्च रोजी माझा वाढदिवस होता. त्यानंतर झालेला हा पहिलाच सत्कार आहे. कवी संमेलनातील सर्व तरुण कवींना पाहून मला माझे तरुणपण आठवले. कवितेची आधी सिद्धी यावी लागते, मग प्रसिद्धी मिळते, असे सांगत बागवे यांनी रसिक आणि कवी यांच्यातील नाते सांगणारी कविता सादर केली. कवीपेक्षा रसिक हा खूप महत्त्वाचा असतो. कारण रसिकाकडे रस असतो, तो कवीकडे नसतो, हे आजच्या कवींनी लक्षात ठेवावे.