सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:24 IST2026-01-15T16:17:52+5:302026-01-15T16:24:53+5:30
कंपन्या कोणताही फोन ३-४ वर्षे टिकेल या हिशोबानेच बनवतात, पण तो किती काळ टिकणार हे सर्वस्वी वापरकर्त्याच्या हाताळणीवर अवलंबून असते.

सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बँकिंगपासून मनोरंजनापर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर अवलंबून आहेत. कंपन्या कोणताही फोन ३-४ वर्षे टिकेल या हिशोबानेच बनवतात, पण तो किती काळ टिकणार हे सर्वस्वी वापरकर्त्याच्या हाताळणीवर अवलंबून असते. जर तुम्हाला तुमचा महागडा स्मार्टफोन वर्षानुवर्षे नवा कोरा ठेवायचा असेल, तर काही सामान्य वाटणाऱ्या पण गंभीर चुका टाळणे आवश्यक आहे.
सॉफ्टवेअर अपडेट टाळणे पडू शकते महाग
अनेक जण इंटरनेट डेटा वाचवण्यासाठी किंवा आळसामुळे मोबाईलचे 'सॉफ्टवेअर अपडेट' करत नाहीत. ही सर्वात मोठी चूक आहे. अपडेट न केल्यामुळे फोनचा वेग तर कमी होतोच, पण सायबर हल्ल्याचा धोकाही कैक पटीने वाढतो. कंपन्या अपडेट्सद्वारे नवीन सुरक्षा फीचर्स पाठवत असतात, त्यामुळे अपडेट कधीही स्किप करू नका.
फोन 'रिस्टार्ट' करण्याची सवय लावा
बहुतेक लोक फोन जोपर्यंत हँग होत नाही किंवा काही तांत्रिक अडचण येत नाही, तोपर्यंत तो कधीच बंद किंवा रिस्टार्ट करत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, फोनमधील सॉफ्टवेअरच्या छोट्या अडचणी दूर करण्यासाठी आणि रॅम क्लियर करण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे. यामुळे फोनची कार्यक्षमता सुधारते.
बॅटरी १००% चार्ज करण्याची गरज नाही!
अनेकांना सवय असते की बॅटरी पूर्ण १००% झाल्याशिवाय ते चार्जर काढत नाहीत, किंवा फोन पूर्णपणे बंद होईपर्यंत तो चार्ज करत नाहीत. या दोन्ही सवयी बॅटरीच्या आरोग्यासाठी घातक आहेत. तज्ज्ञांच्या मते, मोबाईलची बॅटरी २०% ते ८०%च्या दरम्यान राखणे सर्वात उत्तम असते. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते.
अनोळखी स्त्रोतांकडून ॲप्स डाऊनलोड करणे टाळा
गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर सोडून इतर कोणत्याही वेबसाईटवरून ॲप्स डाऊनलोड करणे धोकादायक ठरू शकते. या ॲप्समध्ये 'मालवेअर' किंवा व्हायरस असू शकतात, ज्यामुळे तुमच्या खाजगी माहितीवर हॅकर्स डल्ला मारू शकतात आणि तुमचा फोन कायमचा खराब होऊ शकतो.
सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा
रेल्वे स्टेशन किंवा हॉटेलमधील मोफत वाय-फाय वापरणे आकर्षक वाटत असले तरी ते सुरक्षित नसते. या नेटवर्कचा वापर करून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतात. तसेच, फोन आणि त्यातील महत्त्वाचे ॲप्स नेहमी लॉक ठेवा आणि कोणत्याही अनोळखी उपकरणाशी पेअर करू नका.