आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले; काटकसरीने पाणी वापरण्याचे केले आवाहन
By Appasaheb.patil | Updated: January 4, 2025 17:34 IST2025-01-04T17:32:31+5:302025-01-04T17:34:52+5:30
Solapur News: उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार उजनी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्या मधून रब्बी आवर्तन क्र.१ साठी शनिवार ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १९ वाजता सुरुवातीला ५०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले.

आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले; काटकसरीने पाणी वापरण्याचे केले आवाहन
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - जलसंपदा विभाग मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) अध्यक्षतेखाली झालेल्या उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार उजनी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्या मधून रब्बी आवर्तन क्र.१ साठी शनिवार ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १९ वाजता सुरुवातीला ५०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले. दरम्यान, आवश्कते नुसार विसर्गामधे वाढ करण्यात येणार आहे असल्याचे उजनी धरण लाभक्षेत्र प्रधिकरण विभागाने सांगितले.
उजनी प्रकल्पाच्या पाण्याचे सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी व शेतकरी, नागरिक यांच्या सहकार्यातून अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जलसंपदा विभागामार्फत ४ जानेवारी, १ मार्च व १ एप्रिल अशा एकूण ३ पाळ्या पाणी सिंचनासाठी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतु ४ जानेवारी २०२५ रोजी सिंचनासाठी पहिले आवर्तन उजनी धरणातून सोडल्यानंतर माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेऊन उपलब्ध पाण्यातून जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच प्रत्येक आवर्तनामधून शेतकरी व नागरिकांनी पाण्याची बचत करावी, असेही आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. उजनी प्रकल्पात ४ जानेवारी २०२५ रोजी उपयुक्त पाणीसाठा ५१.९२ टीएमसी (टक्केवारी ९६.९२), अचल पाणीसाठा ६३.६६ टी एम सी तर एकूण पाणीसाठा ११५.५८ टीएमसी असल्याचे सांगितले.