रमजान ईदनिमित्त नियोजित कडक संचारबंदी शिथिल करा; पालकमंत्र्यांकडे दबाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 14:52 IST2021-05-07T14:52:37+5:302021-05-07T14:52:42+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

रमजान ईदनिमित्त नियोजित कडक संचारबंदी शिथिल करा; पालकमंत्र्यांकडे दबाव वाढला
सोलापूर : या आठवड्यात रमजान ईद आहे. ईद काळात कडक संचारबंदी लागू करणे अयोग्य आहे. आम्ही घरातच राहून ईद साजरा करू पण ईदला आवश्यक साधनसामग्री आणायचे कुठून? त्यामुळे ८ ते १५ मे दरम्यान लागू झालेली कडक संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी शहरातील विविध मान्यवरांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
याकरिता पालकमंत्र्यांवर शनिवारी सकाळपासून दबाव वाढतोय. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक सुरू आहे. या बैठक दरम्यान काही मान्यवरांनी नियोजन भवनासमोर गर्दी करून कडक संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी केली आहे. बैठकीदरम्यान शहर काझी अमजद अली हे पालकमंत्र्यांना भेटले असून १५ मे नंतर संचारबंदी लागू करा. त्यापूर्वी लागू केलेली संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत पालकमंत्री सकारात्मक निर्णय न घेतल्यास समाजातील मान्यवरांची बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवू. धोरण ठरवू, अशी माहिती शहर काझी यांनी नियोजन भवनासमोर पत्रकारांशी बोलताना दिली. यासंदर्भात माजी आमदार नरसय्या आडम तसेच आम आदमी पार्टीनेही पालकमंत्र्यांना निवेदन दिले.