आंदोलनाला मिळाले यश; दुकानाला ठाळे ठोकताच शेतकऱ्यांना मिळाले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 15:47 IST2020-11-26T15:47:10+5:302020-11-26T15:47:16+5:30
शेतकरी संघटना आक्रमक; सोलापूर बाजार समितीमधील तक्रारी वाढल्या

आंदोलनाला मिळाले यश; दुकानाला ठाळे ठोकताच शेतकऱ्यांना मिळाले पैसे
सोलापूर : सोलापूरबाजार समितीमध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली बिले वसूल करण्यासाठी गाळा नं. ८८ ला टाळे ठोकून आंदोलन करताच बाजार समिती व गाळा मालक रेवणसिध्द आवजे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांच्या थकलेल्या रकमा रोखीने दिल्यानंतरच आंदोलन थांबवून ठोकलेले टाळे काढण्यात आले.
बाजार समितीचे सचिव बिराजदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी शेतकरी संघटनेचे शंकर गायकवाड यांनी बाजार समितीमध्ये अनेक आडते शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांचे पैसे अडविणाऱ्या अडत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी संघटनेचे शरद भालेकर, सचिन आगलावे, प्रवीण उघडे, पिंटू कोळी, अमर पाटील, रोहन जाधव, आण्णासाहेब पांगरे, रोहित देशमुख आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.