समाज परिवर्तनासाठी महापुरूषांचे तत्वज्ञांचा विचार महत्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:20 IST2019-05-09T12:19:46+5:302019-05-09T12:20:00+5:30

रमजान ईद विशेष...

Legends of great personalities are important for the change of society | समाज परिवर्तनासाठी महापुरूषांचे तत्वज्ञांचा विचार महत्वाचा

समाज परिवर्तनासाठी महापुरूषांचे तत्वज्ञांचा विचार महत्वाचा

कोणत्याही समाजात परिवर्तन हे त्या समाजातील महापुरुषांच्या, तत्त्वज्ञांच्या विचारांमुळे आणि प्रत्यक्ष केलेल्या कार्यामुळेच घडून येते. इस्लामपूर्व अरबस्तानात निर्माण झालेली स्थिती ही प्रेषितकार्याची पार्श्वभूमी होती. प्रेषितांच्यापूर्वी मक्कावासी शहरातून जाणाºया आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गाचा आधार घेऊन व्यापार करत होते. इतर शहरात जाऊन माल विकायचे. त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था व्यापारावर आधारित होती. प्रेषितांचे पिता अब्दुल्लाह हे देखील व्यापारी होते.

विवाहानंतर ते व्यापारासाठी सिरियाला गेले. परतीच्या प्रवासात असताना मदिना येथे त्यांचे निधन झाले. अब्दुल्लाह यांच्या निधनावेळी त्यांच्या पत्नी गर्भवती होत्या. पित्याच्या निधनानंतर प्रेषितांचा जन्म झाला. अब्दुल मुत्तलिब हे प्रेषितांचे आजोबा होते. त्यांनी प्रेषितांचे मोहम्मद (स.) असे नामकरण केले. बाळाच्या जन्मानंतर अरब स्तनपान करण्यासाठी बाळ इतर महिलांकडे देत असत. त्या परंपरेनुसार प्रेषितांना स्तनपानासाठी सोबिया या महिलेच्या सुपूर्द करण्यात आले. तिने काही काळ प्रेषितांना दूध पाजल्यानंतर हलिमा यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. हलिमा बनू साद टोळीच्या सदस्या होत्या. हवाझीनच्या बदावी शाखेतील एक बदावी महिला म्हणून देखील त्यांची ओळख आहे.  

सुरुवातीला हलिमा या प्रेषितांच्या संगोपनासाठी तयार नव्हत्या. कारण अनाथ बालकाचे संगोपन केल्यानंतर त्यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता कमी असायची. त्यामुळे हलिमांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र नंतर त्या तयार झाल्या. प्रेषितांची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी अत्यंत चोखपणे ती पार पाडली. दाई हलिमांना मौखिक इतिहासकथनाचा वारसा लाभला होता. प्रेषित जीवनभर निरक्षर होते. मात्र हलिमांमुळे त्यांना इतिहास आणि सामाजिक घडामोडींचे ज्ञान बालपणात मिळाले होते. दरम्यान याच काळात प्रेषितांच्या आजोबांचे देखील निधन झाले. त्यानंतर त्यांचे चुलते अबु तालीब यांनी प्रेषितांची जबाबदारी स्वीकारली.

अबु तालीब हे मक्का शहरातील प्रतिष्ठित व्यापारी होते. प्रेषितांनी वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्यासोबत पहिला व्यापारी दौरा केला. या व्यापारी दौºयात प्रेषितांनी एका ख्रिश्चन धर्मपंडितांशी चर्चा केली. कालांतराने प्रेषितांना चुलत्याच्या शिफारशीने वयाच्या पंचवीशीत खदिजा या महिलेच्या व्यापारी टोळीच्या नेतृत्वाची संधी मिळाली. खदिजा यांच्या सिरियाकडे जाणाºया व्यापारी टोळीचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. सिरियावरून परतल्यानंतर खदिजा यांना व्यापारी टोळीच्या नफ्यात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर प्रेषित मोहम्मद (स.) यांच्याकडे खदिजा यांनी आपल्या दासीकरवी विवाहाचा प्रस्ताव दिला.

चुलते अबु तालीब यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रेषितांनी विवाहास सहमती दर्शवली. विवाहासमयी प्रेषितांचे वय अवघे पंचवीस होते. तर खदिजा चाळीस वर्षाच्या होत्या. खदिजा हयात असेपर्यंत प्रेषितांनी दुसºया स्त्रीशी विवाह केला नाही. खदिजा यांच्यावर प्रेषितांचे प्रचंड प्रेम होते. एकदा प्रेषितांच्या दुसºया पत्नी हजरत आएशा (रजि.) यांनी ‘ती एकटीच पत्नी तुमच्या प्रेमास पात्र होती काय?’ असे विचारले. त्यावेळी प्रेषित म्हणाले, ‘तिने माझ्यावर विश्वास टाकला होता. जेव्हा अन्य कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. लोकांची माझ्यावर श्रध्दा नव्हती. विश्वास नव्हता. त्यावेळी तिने इस्लामचा स्वीकार केला होता.’

अन-नूर डोंगर रांगेत हिरा नावाची गुहा होती. प्रेषितांचे ते आवडीचे ठिकाण होते. तेथे प्रेषित चिंतन करत असत. त्याच चिंतनाच्या अवस्थेत त्यांना अल्लाहचे दूत जिब्राईल यांच्या प्रेषितत्वाची प्राप्तीची आनंदवार्ता समजली.
- आसिफ इक्बाल

Web Title: Legends of great personalities are important for the change of society