उन्हाच्या तडाख्यानं पालेभाज्या महागल्या, भाज्यांचा पुरवठा कमी झाला

By दिपक दुपारगुडे | Updated: April 26, 2023 19:06 IST2023-04-26T19:05:53+5:302023-04-26T19:06:36+5:30

उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे.

Leafy vegetables became expensive due to scorching summer supply of vegetables decreased | उन्हाच्या तडाख्यानं पालेभाज्या महागल्या, भाज्यांचा पुरवठा कमी झाला

उन्हाच्या तडाख्यानं पालेभाज्या महागल्या, भाज्यांचा पुरवठा कमी झाला

सोलापूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण घटल्यामुळे त्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींना खर्चाचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत आहे. वाढत्या तापमानाचे चटके भाज्यांच्या उत्पादनाला आणि पर्यायाने ग्राहकांना बसू लागले आहेत. सोलापूर बाजारात होणारा भाज्यांचा पुरवठा घटल्याने सर्वच भाज्यांचे किरकोळ बाजारातील दर किलोमागे ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत.

उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम भाजीपाल्यावरही होऊ लागला असून, मेथी, कोथिंबीरसारख्या भाज्यांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मेथीच्या जुडीसाठी तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत होते. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात मेथीची पेंढी ५ ते १० रुपयाला विकली जात होती, अशी माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.

आलेही महागले
मार्चअखेरीस आल्याचा हंगाम संपतो. त्यामुळे नव्या आल्याची आवक सध्या सुरू झालेली नाही. त्यामुळे आलेही १२० रुपये किलोवर गेले आहे.

शेतकऱ्यांसाठी लिंबू झाला आंबट
गेल्या महिन्यात लिंबूचे दर दीडशे रुपये किलो होते. तशातच नवा बहर आल्याने आणि ढगाळ वातावरणासह वादळ व अवकाळीचा फटका बसताच लिंबांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली. परिणामी २० रुपयांना तीन मिळणारे लिंबू आता १० ला दोन मिळत आहेत.

भाजपाल्यांचे प्रति किलो दर
भाजी             दर
वांगी            ३० ते ४०
गवार            ६०-८०
मेथी             १५-२०
आले            १००-१२०
बटाटा          २०-२५

Web Title: Leafy vegetables became expensive due to scorching summer supply of vegetables decreased