भाविकांना दशमी - द्वादशीस तांदळाची खिचडी, एकादशीला शाबुदाण्याची खिचडी वाटणार
By काशिनाथ वाघमारे | Updated: April 18, 2024 18:09 IST2024-04-18T18:09:13+5:302024-04-18T18:09:21+5:30
त्याचबरोबर यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात येत आहे.

भाविकांना दशमी - द्वादशीस तांदळाची खिचडी, एकादशीला शाबुदाण्याची खिचडी वाटणार
सोलापूर : चैत्री शुद्ध एकादशी १९ एप्रिल रोजी होत असून या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. सध्या उन्हाळा असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी पंढरपुरात पत्राशेड व दर्शनरांगेत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तसेच दर्शन रांगेतील भाविकांना दशमी, व द्वादशी दिवशी तांदळाची खिचडी, एकादशी दिवशी साबुदाण्याची खिचडी त्याचबरोबर लिंबू सरबत अथवा मठ्ठा मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
याचा शुभारंभ गुरुवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच विभागप्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी, बलभीम पावले व भीमाशंकर सारवाडकर उपस्थित होते.
त्याचबरोबर यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच आरोग्य सुविधा, लाइव्ह दर्शन व्यवस्था आदींची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मंदिर समितीमार्फत यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आवश्यकतेनुसार वाढवण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.