पंढरपूरच्या कॉरिडोरबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; अधिकाऱ्यांनाही दिल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:12 IST2025-03-30T12:12:13+5:302025-03-30T12:12:32+5:30
भूसंपादनात आतापर्यंत कोणत्याही प्रोजेक्टमध्ये मिळाले नाही, असा मोबदला आम्ही देणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पंढरपूरच्या कॉरिडोरबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; अधिकाऱ्यांनाही दिल्या सूचना
CM Devendra Fadnavis: "कोणत्याही प्रकारची लपवाछपवी न करता लोकांना विश्वासात घेऊन पंढरपूर शहरात आम्हाला कॉरिडोरचे काम सुरू करायचे आहे. पुढील तीन महिन्यांत जमीन अधिग्रहणाचे काम सुरू केले जाईल," असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंढरपूच्या दौऱ्यात दिला आहे. यामुळे गत वर्षापासून पंढरपुरात कॉरीडोर होणार की नाही, याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार अर्शीवाद, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या उपस्थित तीर्थक्षेत्र विकास आरखड्याबद्दल बैठक घेतली.
"श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेली कामे समाधानकारक होत आहेत. त्यातील अधिकाधिक कामे आषाढीच्या पूर्वी होतील, अशी माहिती मिळाली आहे. काही कामे आषाढीनंतर होतील. याच्याव्यतिरिक्त कॉरिडोरचे काम करण्याबाबत आरखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये काही जमीन व प्रॉपर्टीज अधिग्रहण कराव्या लागणार आहेत. त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत व्यिस्थापित न करता, चांगला मोबदला देण्यात येणार आहे. ज्यांची दुकाने आहेत, त्यांना दुकाने द्यायची आणि मोबदला देण्यात येणार आहे," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भूसंपादनात आतापर्यंत कोणत्याही प्रोजेक्टमध्ये मिळाले नाही, असा मोबदला आम्ही देणार आहोत. लोकांना विश्वासात घेऊनच हे करणार आहे. जिल्हा प्रशासनाने चांगला आराखडा केला आहे. मी त्यांना सांगितले आहे की, लोकप्रतिनीधी व त्या भागातील लोकांशी आराखड्याबाबत चर्चा करा. त्यांना आरखडा त्यांना समजून सांगा, असेही त्यांनी सांगितले.
आपण काय देणार आहोत, लोकांना समजावून सांगा
"आपण काय देणार आहोत, हे लोकांना समजावून सांगा. त्यानंतर आपण जागा अधिग्रहण करण्याचे काम सुरू करू. त्यामुळे काही लपवा-लपवी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम आम्हाला लवकर सुरू करायचे आहे. पुढील तीन महिन्यांत जमीन अधिग्रहणाचे काम सुरू करायचे आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितलं.