दोन फॉलोअर्स कमी झाले, पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, पोलीसही समजावून सांगून थकले, शेवटी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:54 IST2025-06-11T16:53:14+5:302025-06-11T16:54:15+5:30
Viral News: इन्स्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाल्याने एका महिलेने तिच्या पतीसोबत कडाक्याचे भांडण केले

दोन फॉलोअर्स कमी झाले, पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, पोलीसही समजावून सांगून थकले, शेवटी...
उत्तर प्रदेशच्या हापुड येथे सगळ्यांना चक्रावून टाकणारी घटना घडली. इन्स्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाल्याने एका महिलेने तिच्या पतीसोबत कडाक्याचे भांडण केले आणि आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर महिलेच्या पतीने जवळच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महिलेचे समुपदेशन करण्यात आले.
ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यात सोशल मीडियावरून दररोज कडाक्याचे भांडण होत असत. पतीने आरोप केला आहे की, "त्याची पत्नी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती दररोज दोन रील बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. यामुळे ती घरातील कामांना हात लावत नाही आणि फॉलोअर्सची संख्या कमी होते, तेव्हा त्याच्याशी भांडते. परंतु, आता पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि माहेरी निघून गेली."
ही घटना जितकी विचित्र आहे, तितकीच गंभीर आहे. महिला ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक अरुणा राय यांनी दोघांना पोलिस ठाण्यात बोलावले आणि त्यांचे समुपदेशन केले. त्यावेळी पत्नीने सांगितले की, तिच्या पतीने तिला स्वयंपाकघरातील भांडे धुवायला सांगितली. त्यामुळे तिचे दोन फॉलोअर्स कमी झाले. त्यामुळे ती खूप नाराज झाली आणि ती रागाच्या भरात माहेरी निघून गेली.
दरम्यान, दोघांनाही समजावून सांगण्यात आले की, सोशल मीडिया हा जीवनाचा एक भाग असू शकतो, पण तो जीवनाचा आधार असू शकत नाही. इन्स्पेक्टर अरुणा राय यांनी महिलेला कुटुंब, समाज आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांचे महत्त्व समजावून सांगितले. चार तासाच्या समुपदेशनानंतर दोघांनाही आपली चूक कळली, आता दोघेही एकत्र राहण्यास तयार झाले आहेत.