पालगडमध्ये पाणीटंचाई तीव्र
By Admin | Updated: December 15, 2015 00:36 IST2015-12-14T23:52:48+5:302015-12-15T00:36:35+5:30
दापोली तालुका : मळेकरवाडीतील सार्वजनिक विहिरीचे पाणी आटले

पालगडमध्ये पाणीटंचाई तीव्र
दापोली : उन्हाचा कडाका वाढू लागला असून, पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. पाणीटंचाईची सर्वात जास्त झळ ग्रामीण भागाला बसत आहे. यात दापोली तालुक्यातील पालगड मळेकरवाडी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येला आत्तापासूनच सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांच्या नशिबी अजूनही पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. ही वणवण कधी थांबणार? असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे. पालगड मळेकरवाडी येथे पस्तीस कुटुंबे वास्तव्यास आहेत. १५० लोकवस्तीच्या मळेकरवाडीला दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून पाण्याची टंचाई भासते. मार्च महिन्यानंतर तर कोरडा दुष्काळच पडतो. शासनाच्या उदासीनतेमुळे येथे पाण्यासाठी तब्बल दीड ते दोन कि. मी.ची पायपीट करावी लागते. येथे असणाऱ्या सार्वजनिक विहिरीची तीन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. सदर विहीर दुरूस्तीची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. परंतु, शासनाने मात्र याकडे दूर्लक्ष करून सदर विहीर त्याच अवस्थेत ठेवली आहे. येथे असणाऱ्या विहिरी शिवाय या वाडीला पाण्यासाठी दुसरा पर्याय नाही. शासनाकडून गावासाठी नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, केल्या जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा खूपच कमी आहे. ऐन उन्हाळ्यात एखाद्या कार्यक्रमासाठी पाचशे लीटर पाण्याला २०० रूपये मोजावे लागतात. पावसाच्या पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन नसल्याने पावसाळ्यात तुडूंब भरणाऱ्या नद्या, नाले, विहिरी मार्च महिना सुरू झाली की कोरड्या होतात. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मळेकरवाडी येथील सदर विहिरीची दुरूस्ती करावी किंंवा दुसऱ्या ठिकाणी नवीन विहीर बांधून मिळावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)
पावसाचे प्रमाण कमी : पाण्याचे दुर्भिक्ष्यच
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भविष्यात पाणीटंचाईची झळ अधिक बसणार आहे. पाणी टंचाईचा सामना करताना पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी वनराई, विजय बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, पालगड येथील मळेकरवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष्यच दिसत आहे.
पाण्यासाठी पैसे
मळेकरवाडीतील ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी पायपीटच आहे. पाण्याची तहान भागवण्यासाठी ग्रामस्थांना २०० रूपये मोजावे लागत आहेत.
मळेकरवाडीत १५० लोकवस्ती.
सार्वजनिक विहिरीची तीन वर्षापासून दुरवस्था.
शासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांची पायपीट़
सार्वजनिक विहिरीशिवाय दुसरा पर्याय नाही.
विहिरीच्या दुरूस्तीची मागणी.