Sindhudurg: आप्पासाहेबांसारखे देवदुर्लभ नेतृत्व पुन्हा होणे नाही - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 17, 2025 16:43 IST2025-02-17T16:42:24+5:302025-02-17T16:43:35+5:30

देवगड येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप

Rare leadership like Appasaheb will not happen again says Union Minister Nitin Gadkari | Sindhudurg: आप्पासाहेबांसारखे देवदुर्लभ नेतृत्व पुन्हा होणे नाही - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

Sindhudurg: आप्पासाहेबांसारखे देवदुर्लभ नेतृत्व पुन्हा होणे नाही - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

देवगड : राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे. जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडे विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून आप्पासाहेब गोगटे यांनी काम केले आप्पासाहेबांसारखे दैव दुर्लभ नेतृत्व अभावानेच जन्माला येते अशा शब्दात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देवगडचे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचा गौरव केला.

आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्षतेखाली सोमवारी झाला. यावेळी महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,  प्रकाश गोगटे, माजी आमदार डॉक्टर विनय नातू,  राष्ट्रीय वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट संग्राम देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जातीपातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे 

गडकरी म्हणाले, जातपात धर्म विसरून केवळ माणुसकी म्हणून काम करण्याची करण्याचा आप्पासाहेब गोगटे यांचा स्वभाव होता. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या नावामागे कधीही "यादव" लावले नाही, तसेच परशुरामांनी "शर्मा" लावले नाही. त्यामुळे आपणही जातीपातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी माणूस ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा उपयोग करून पुढे जायला हवा.

कार्याची दखल घेतल्याचे वेगळे समाधान 

मी आणि माझी पत्नी बौद्ध धर्माच्या ठिकाणी गेलो होतो. त्या वेळी भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले आणि बोधी वृक्षाखाली उभा असताना वटवृक्षाचे पान माझ्या खांद्यावर पडले. तेव्हा उपस्थित बौद्ध भिकूंनी सांगितले की हे भगवान बुद्धांचे आशीर्वाद आहेत. अशा प्रसंगातून आपण समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली जाते, याचा आनंद होतो.

आप्पांचे योगदान मोठे

आप्पासाहेब गोगटे यांनी कधीच स्वतःचे कटआउट्स लावले नाहीत, प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांनी निस्वार्थी भावनेने समाजासाठी कार्य केले. गरिबांसाठी, शोषितांसाठी, बेघरांसाठी, शिक्षण आणि विकासासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.

हजारो कार्यकर्त्यांनी काम करणे हेच मोठे यश

आज मी या कार्यक्रमाला आलो याचे कारण म्हणजे आप्पांच्या कार्याचा सन्मान करणे. आप्पांसारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आजचा पक्ष आणि राज्य उभे राहिले आहे. मंत्रीपद किंवा सत्ता मिळवणे हे खरे यश नाही, तर हजारो कार्यकर्त्यांनी निःस्वार्थ भावनेने काम करणे हेच खरे यश आहे.

आप्पांच्या विचाराचे कार्य पुढे नेऊया

आप्पांनी संघ आणि जनसंघासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतींना वंदन करताना आपणही त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा. आज देश समृद्ध, शक्तिशाली, आणि विश्वगुरू बनवण्यासाठी आपल्याला त्यांच्या विचारांप्रमाणे कार्य करावे लागेल.आप्पांसारख्या कार्यकर्त्यांचे स्मरण करत, त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आपण पुढे जाण्याचा संकल्प करूया. त्यांची आत्मा स्वर्गात निश्चितच समाधानी असेल की आपण त्यांचे कार्य पुढे नेत आहोत.

Web Title: Rare leadership like Appasaheb will not happen again says Union Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.