नारळाच्या करवंटीला हस्तकलेची जोड; परुळे येथील प्रथमेश नाईकचा प्लास्टिकविरोधी लढा यशस्वी
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 6, 2025 16:44 IST2025-06-06T16:43:51+5:302025-06-06T16:44:08+5:30
पर्यटकांनाही भुरळ

नारळाच्या करवंटीला हस्तकलेची जोड; परुळे येथील प्रथमेश नाईकचा प्लास्टिकविरोधी लढा यशस्वी
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे की, पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमीत कमी करू. तेव्हाच कुठे तरी आपण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी काही तरी प्रामाणिक प्रयत्न करतोय, असे म्हणता येईल. वेंगुर्ला तालुक्यातील परुळे येथील प्रथमेश नाईक या युवकाने गेल्या काही वर्षांत प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत. नारळाच्या करवंटीला हस्तकलेची जोड देऊन प्रथमेशने देशी-विदेश पर्यटकांनाही भुरळ घातली आहे.
प्रथमेश ऊर्फ चंदू नाईक वेंगुर्ल्यातील परुळे गावात राहणारा एक युवा उद्योजक. आपण काही तरी वेगळं करायचं, ना पर्यावरणाला ना मनुष्याला हानी व्हावी, घडविणाऱ्याला आणि उपभोगत्याला दोघांनाही नफा मिळावा; पण उत्पादन येथून कोकणातून निर्यात झालं पाहिजे, असे कायम म्हणणाऱ्या प्रथमेशने पर्यावरणपूरक कृषीविषयक व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने साधारण २०१० सालात ‘सिद्ध ॲग्रो इंडस्ट्रिज’ ची सुरुवात केली.
सुरुवातीला सुपारीच्या पोयपासून उत्पादने करण्यास सुररुवात केली. मशिन्स तयार करून त्या बागायतदारांकडे देऊन त्यांना वस्तू बनविण्यास सांगितले. पण तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. मग घरीच मशीन आणून व्यवसाय सुरु केला. पोवल्या मात्र स्वतः जमा कराव्या लागायच्या. २०१३ साली पूर्ण वेळ व्यावसायिक स्वरुपात सुरुवात केली मग मागणी वाढू लागली.
प्रकाश आमटेंकडून प्रथमेशला पोचपावती
सध्या सिद्ध ॲग्रोची आठ एकर जागा परुळे येथे आहे. त्यात विविध कृषी व्यवसाय सुरू करण्याचा त्याचा मानस आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी आमटे यांची दयाळू पावले सिद्ध ॲग्रोच्या स्वदेशी नंदनवनात फिरकली आणि कलेचं व मेहनतीच्या मोलाची पोचपावती प्रथमेश नाईक यांना मिळाली आहे.
पत्रावळी परदेशात निर्यात
मुंबई पुण्यातही मालाची मागणी वाढू लागली. त्यानंतर जुन्या मशीन्स बदलून अत्याधुनिक मशीन्स आणल्या. उत्पादनातील दर्जेदारपणा आणि मागणी या दोन्हीतही वाढ झाली. सध्या सिद्ध ऍग्रो इंडस्ट्रीची उत्पादने परदेशातही निर्यात होत आहेत. परदेशात आज अनेक परदेशी हे कोकणातील स्वदेशी पत्रावळीवर अन्न ग्रहण करतात.
लॉकडाउनने प्रथमेश झाला आत्मनिर्भर
लॉकडाउनच्या काळात इतरांप्रमाणे प्रथमेश नाईक यांच्या व्यवसायावरदेखील परिणाम झाला होता; पण रडगाणं गात न बसता याच वेळेचा योग्य फायदा घेत त्याने नारळाच्या करवंटीपासून बनणाऱ्या वस्तूंचा अभ्यास केला. सुपारीच्या पानापासून बनणाऱ्या विविध वस्तू हे त्यांचे प्रथम उत्पादन..!आता त्याच बरोबर सिद्ध ॲग्रो नारळाच्या करवंटीपासून बनणाऱ्या या विविध नावीन्यपूर्ण वस्तू तयार करतात. त्यांना ग्राहकांचा प्रतिसादही उत्तम मिळत आहे.
कलेला व्यवसायाची जोड
सिंधुदुर्गचेपर्यटनाच्या बाबतीत देशातच नाही तर जागतिक स्तरावर नावलौकिक आहे. येथील जैवविविधता, लोककला, संस्कृती पर्यटकांना नेहमीच भूरळ घालते. येथील स्थानिक माणसात उपजत कलागुण दडलेले असतात. प्रथमेश नाईक यांनी आपल्यातील कलेला व्यवसायाची जोड दिली आहे.
ग्रामीण भागात पूर्वी चांदवड, चारोळी, वड यासारख्या पानांच्या पत्रावेळी तयार करून जेवणासाठी वापरल्या जायच्या. हे नैसर्गिक ताट प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे होते. मात्र, कालावोघात त्याची जागा प्लास्टिक, थर्माकॉल सारख्या पत्रावळींनी घेतली आणि पर्यावरण समस्या निर्माण झाली.
टाकाऊ करवंटी, सुपारीच्या पानांपासून टिकाऊ वस्तू
सुपारीच्या पानांपासून आकर्षक लहान मोठ्या डिश, ताट वेगवेगळ्या आकाराचे चमचे, नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले टिकाऊ कप, बाऊल, शोपीस आदी विदेशी पर्यटकांना भाेवले आहेत. याचे उत्पादन प्रथमेश मोठ्या संख्येने गेली काही वर्षे घेत आहे आणि ते आता लोकप्रिय झाले आहेत.
मुंबई, पुण्यात विक्री
प्रथमेश नाईक आपल्या इको फ्रेंडली वस्तूंची कोणतीही जाहिरात करत नाहीत. मात्र, फेसबुक, व्हॉटस्ॲप अशा सोशल मीडियाच्या साइटवरून ती कला सर्वदूर पोहोचली आहे. यामुळे मुंबई, पुणे व इतर शहरांत होणाऱ्या प्रदर्शनासाठी तेथील व्यावसायिक त्यांच्या या पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली वस्तूंची खरेदी करतात.