Sindhudurga:..अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार; वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

By सुधीर राणे | Updated: October 10, 2023 17:03 IST2023-10-10T16:57:38+5:302023-10-10T17:03:00+5:30

शेतकऱ्यांना आंबा, काजू पिकविमा रक्कम न मिळाल्याने घेतला पवित्रा

otherwise the district agriculture superintendent office will be blocked; Warning by Vaibhav Naik, Satish Sawant | Sindhudurga:..अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार; वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

Sindhudurga:..अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार; वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

कणकवली: फळ पिकांचा नवीन हंगाम सुरू व्हायला आला तरी देखील विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. औषध फवारणीसाठी, झाडांची देखभाल करण्यासाठी लागणारे पैसे आता शेतकऱ्यांकडे नाहीत. आंदोलने करून निवेदने देऊन देखील सरकार याकडे लक्ष देत नसल्याने १ नोव्हेंबर २०२३ रोजी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडून सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे. 

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य तसेच केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा ५३ कोटी रुपये हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे  १२० कोटी रुपये रक्कम प्रलंबीत आहे. ही रक्कम गणेशोत्सवापूर्वी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी, शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केले होते. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी विमा रक्कम देण्याची ग्वाही दिली होती. मात्र आता फळ पिकांचा नवीन हंगाम सुरू व्हायला आला तरी देखील विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 

आंबा व काजू पिक विमा योजनेत केंद्र व राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचे ५३ कोटी रुपये अद्याप भरले नाहीत. या योजनेत शेतकऱ्यांनी आपल्या हप्त्यापोटी ११ कोटी रुपये भरले आहेत. जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी सन २०२२-२३ मध्ये ३८४६७ शेतकरी सहभागी झाले आहेत. १ डिसेंबरपासून २०२२ पासून  विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे २०२३  पर्यंत होता. शासन निर्णयानुसार पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या  ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्यान पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्याप हि रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: otherwise the district agriculture superintendent office will be blocked; Warning by Vaibhav Naik, Satish Sawant