मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय, वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 14:30 IST2019-06-25T14:28:56+5:302019-06-25T14:30:09+5:30

कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पावसामुळे महामार्ग चिखलमय झाल्याने या मार्गावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

Mumbai-Goa highway muddy, motorcyclist's exercise | मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय, वाहनचालकांची कसरत

कणकवली शहरात पडलेल्या पावसाने महामार्ग पुन्हा चिखलमय झाला होता.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग चिखलमय महामार्गावरून वाहने चालविताना वाहनचालकांची कसरत

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पावसामुळे महामार्ग चिखलमय झाल्याने या मार्गावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

रविवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. कडक ऊनही पडले होते. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यातच महामार्गाच्या शेजारी गटारे बांधण्यात न आल्याने पावसाचे चिखलमिश्रीत पाणी रस्त्यावर येत आहे. पाऊस थांबल्यावर रस्त्यावर पसरलेला चिखल काहीसा सुकत आहे. मात्र, या चिखलामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले आहे. तर वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.

चिखलामुळे अनेक पादचारी पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या त्रासापासून आपल्याला कोण सोडविल?असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारा ठेकेदार या समस्येकडे लक्ष देत नाही. तर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

महामार्गाचे काम करीत असताना गटारे तयार करण्यात न आल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. काही विहिरींमध्ये हे पाणी जात असल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी महामार्गावर पसरल्याने त्यातून चालत जात असल्याने पादचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
 

Web Title: Mumbai-Goa highway muddy, motorcyclist's exercise