खारेपाटण संभाजीनगरमध्ये भूस्खलन, काजूबागेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:08 IST2020-08-10T17:06:57+5:302020-08-10T17:08:22+5:30
गेले चार ते पाच दिवस मुसळधार कोसळत असलेल्या वादळी पावसामुळे खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी मधुकर शंकर गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.

खारेपाटण संभाजीनगर येथील मधुकर गुरव यांच्या जमिनीत भूस्खलन होऊन काजूच्या झाडांचे नुकसान झाले आहे.
खारेपाटण : गेले चार ते पाच दिवस मुसळधार कोसळत असलेल्या वादळी पावसामुळे खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी मधुकर शंकर गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या संभाजीनगर येथील फळबागायती असलेल्या त्यांच्या सुमारे १५ गुंठे जमिनीत भूस्खलन झाले. या जमिनीला भेगा व तडे जाऊन ती बाधित झाली आहे. यात काजू, खैर व जंगली झाडांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, तलाठी रमाकांत डगरे यांनी तातडीने भूस्खलन झालेल्या ठिकाणी भेट देऊन नुकसानग्रस्त बागेची व जागेची पाहणी केली. पंचयादी घालून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविणार असल्याचे तलाठी रमाकांत डगरे यांनी यावेळी सांगितले.
खारेपाटण संभाजीनगर येथील मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेली डोंगर भागातील सर्व्हे क्र. ३/२ ची जमीन मधुकर गुरव यांच्या मालकीची आहे. या जमिनीमध्ये त्यांनी काजू कलमे लावली आहेत. या व्यतिरिक्त खैर व इतर झाडेदेखील होती.
परंतु, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात गुरव यांच्या या जमिनीच्या काही डोंगर भागातील मातीचे उत्खनन करून दुसऱ्या ठिकाणी भराव करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने तो तोडण्यात आला होता.
जमिनीचा डोंगर भाग हा १५० फूट लांब व जमिनीच्या पातळीपासून सुमारे ३० फूट उंचीएवढा सरळ उभा कापण्यात आला होता. त्यामुळे तो उंच दरडीसारखा धोकादायक झाला होता. भूस्खलन झाल्याने गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.