झाराप येथे महामार्गावरील टपऱ्यांना भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:02 IST2020-05-18T17:59:03+5:302020-05-18T18:02:52+5:30
झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत असलेल्या टपऱ्यांना लागलेल्या भीषण आगीत दोन टपऱ्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. यात या टपऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत असलेल्या टपऱ्यांना आग लागल्यानंतर धुराचे मोठमोठे लोट उठले.
कुडाळ : झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत असलेल्या टपऱ्यांना लागलेल्या भीषण आगीत दोन टपऱ्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. यात या टपऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत काही स्थानिक नागरिकांची चहा तसेच नाश्ता विक्री करणारी काही टपरीवजा दुकाने आहेत. यातून तेथील काही व्यक्तींना रोजगार मिळत आहे.
रविवारी दुपारी त्या टपऱ्यांना अचानक आग लागली व धुराचे लोट बाहेर पडू लागले. टपºयांना आग लागल्याचे तेथून जाणाऱ्या काही वाहनचालकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती ग्रामस्थांना दिली.
याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी झाराप सरपंच स्वाती तेंडोलकर, तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान मांजरेकर, गुरू पेंडुरकर, उमेश पेंडुरकर, बशीर खान, अनिकेत तेंडोलकर, अजित मांजरेकर व इतर ग्रामस्थ दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
सरपंच तेंडोलकर यांनी कुडाळ तहसीलदार रवींद्र नाचणकर व अग्निशमन दलाला कळविले. काही वेळातच अग्नीशमन दल दाखल होत त्यांनी या आगीवर नियंत्रण आणले. ही आग या टपºयांच्या मागील बाजूस असलेल्या माळरानावर पसरली. मात्र, आग कशी लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.
सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने आजूबाजूच्या टपऱ्यांचे या आगीपासून होणारे नुकसान टळले. या घटनेत श्रीधर हरमलकर व उत्तम डिचोलकर या दोघांच्या टपऱ्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती तेंडोलकर यांनी दिली.