कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरण : रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 19:32 IST2020-09-09T19:31:02+5:302020-09-09T19:32:07+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला दिलीप बिल्डकॉन कंपनीने पुन्हा सुरुवात केली आहे.

शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या स्लॅबचे काम जलदगतीने सुरू असल्याचे दिसून येते आहे. (छाया : ओंकार ढवण)
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला दिलीप बिल्डकॉन कंपनीने पुन्हा सुरुवात केली आहे.
गांगोमंदिर ते शासकीय विश्रामगृहापर्यंत हे उड्डाणपूल होत आहे. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर रुंदीकरण तसेच निकृष्ट दर्जाचे काम उघड होत असताना नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
त्यानंतर आता कणकवली शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी उड्डाणपुलाचे काम जलदगतीने सुरू असल्याचे चित्र दिसून येते आहे. शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीला या उड्डाणपुलामुळे पूर्णविराम मिळणार आहे.
मात्र, कणकवली एस. एम. हायस्कूल ते नरडवे नाकापर्यंतच्या पिलरचे काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अप्पासाहेब पटवर्धन चौकजवळील काही भागात वाय बिम आकाराच्या पिलरवर उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या स्लॅबचे काम अजूनही जलद गतीने सुरू आहे. जुलै महिन्यात या ठिकाणी दोन दुर्घटना घडल्या होत्या. त्यानंतर काम बंद पाडण्यात आले होते. आता ते काम पुन्हा सुरू झाले आहे.