आत्मनिर्भर कक्ष करणारी ही पहिलीच नगरपंचायत : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:13 IST2020-10-20T18:12:00+5:302020-10-20T18:13:50+5:30
Nitesh Rane, vaibhavwadi , sindhudurgnews केंद्र शासनाने सुरू केलेल्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा; या हेतूने स्वतंत्र आत्मनिर्भर कक्ष सुरू करणारी वाभवे वैभववाडी ही देशातील पहिली नगरपंचायत आहे. या कक्षाचा अडचणीत असलेल्या लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.

वैभववाडी नगरपंचायतीत आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी समिता कुडाळकर, रोहन रावराणे आदी उपस्थित होते.
वैभववाडी : केंद्र शासनाने सुरू केलेल्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा; या हेतूने स्वतंत्र आत्मनिर्भर कक्ष सुरू करणारी वाभवे वैभववाडी ही देशातील पहिली नगरपंचायत आहे. या कक्षाचा अडचणीत असलेल्या लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.
वैभववाडी नगरपंचायत कार्यालयात आत्मनिर्भर कक्षाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्षा समिता कुडाळकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, नगरसेवक रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, सुचित्रा कदम, दिलीप रावराणे, मुख्याधिकारी सूरज कांबळे, स्नेहलता चोरगे आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, लोकांनी स्वावलंबी व्हावे, तळागाळातील प्रत्येकाला रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून येथील लोकांना चांगली संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा कुडाळकर यांनी आतापर्यंत नगरपंचायतीकडे १०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ४० प्रस्ताव बँकेकडे देण्यात आले होते. त्यातील १८ प्रस्तावाना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे सांगितले.
आत्मनिर्भर योजनेचे ए. एस. पाटील यांनी आत्मनिर्भर ही दुर्लक्षित घटकांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेतून लाभार्थ्यास विनातारण बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्ती
योजनेचे प्रस्ताव करताना काही अडचणी, समस्या निर्माण झाली तर तिची सोडवणूक वेळेत व्हायला हवी यासाठी नगरपंचायतीने आत्मनिर्भर भारत कक्ष स्थापन केला आहे. नगरपंचायतीने सुरू केलेला हा देशातील पहिला कक्ष आहे. या कक्षामध्ये एक प्रशिक्षित कर्मचारी असणार आहे. हा कर्मचारी लाभार्थ्याने कागदपत्राची पूर्तता केली आहे का याची चाचपणी करेल. काही कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील तर त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यास सहकार्य करेल.