पाणमांजरांचे संवर्धन करणार : संजू परब यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:36 IST2020-06-27T16:35:34+5:302020-06-27T16:36:46+5:30
सावंतवाडी येथील मोती तलावात पाणमांजरांचे आगमन हे पर्यावरणीय समृद्धीचे निदर्शक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षित अशा या प्राण्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केली होती. याला सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पाणमांजरांचे संवर्धन व्हावे यासाठी नगरपालिका प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले आहे.

माजी नगरसेवक विलास जाधव यांना नगराध्यक्ष संजू परब यांनी आपत्कालीन पुस्तक भेट दिली.
सावंतवाडी : सावंतवाडी येथील मोती तलावात पाणमांजरांचे आगमन हे पर्यावरणीय समृद्धीचे निदर्शक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षित अशा या प्राण्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केली होती. याला सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पाणमांजरांचे संवर्धन व्हावे यासाठी नगरपालिका प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले आहे.
सावंतवाडीच्या मोती तलावात मोठ्या प्रमाणात पाणमांजरे आढळत असून ही पाणमांजरे तलावातील मासे खातात अशी ओरड अनेकांनी केली होती. त्यामुळे ही पाणमांजरे मोती तलावाबाहेर काढली जावीत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेच्यावतीने अध्यक्ष सतीश लळीत यांनी ही पाणमांजरे नष्ट करू नये, अशी मागणी केली होती.
पाणमांजरांचे अस्तित्व हे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही उपयुक्त ठरु शकेल, त्यादृष्टीने पाणमांजरांच्या आगमनाकडे पहावे, असे मत सतीश लळीत यांनी मांडले होते.
सावंतवाडी आणि परिसरात असलेल्या जैवविविधतेचे जतन करणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा माणसाला आगामी काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे सावंतवाडी परिसरात आढळणाऱ्या दुर्मिळ प्राणी, पक्षांचे जतन करणे आवश्यक असल्याची भावना लळीत यांनी मांडली होती.
स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन संवर्धन करणार
पाणमांजरांच्या संवर्धनासाठी सावंतवाडी नगरपालिकेचीही महत्त्वाची भूमिका होती. नगराध्यक्ष संजू परब यांनी ही पाणमांजराचे संवर्धन होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ही पाणमांजरे नष्ट करणार नसून स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन काय करता येईल याचा अभ्यास करू, असे परब यांनी स्पष्ट केले आहे.