तिन्ही राज्यमार्गांची अवस्था दयनीय, दोडामार्गवासीय आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:26 IST2021-04-15T17:24:59+5:302021-04-15T17:26:29+5:30
Dodamarg Highway Sindhudurg : गेल्या दोन वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यातील जनतेला भेडसावत असलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे तालुक्यातील नादुरुस्त राज्यमार्ग. तिन्ही राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली असून जनतेसाठी डोकेदुखी बनली आहे. मात्र, याकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम विभागाला जागे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे.

तिन्ही राज्यमार्गांची अवस्था दयनीय, दोडामार्गवासीय आक्रमक
दोडामार्ग : गेल्या दोन वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यातील जनतेला भेडसावत असलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे तालुक्यातील नादुरुस्त राज्यमार्ग. तिन्ही राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली असून जनतेसाठी डोकेदुखी बनली आहे. मात्र, याकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम विभागाला जागे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे.
दोडामार्ग तालुक्यातून जाणारे बांदा-आयी-तिलारी हे तिन्ही राज्यमार्ग बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून नादुरुस्त रस्ते डांबरीकरण करण्यासंदर्भात दोन वर्षांपासून अनेक आंदोलने, उपोषणे झाली. परंतु या रस्त्यांबाबत आश्वासनांपलीकडे कोणतीच कार्यवाही झाली नाही. तालुक्यातील या तिन्ही मार्गांची दुरवस्था झाली असून त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच चालकांना व नागरिकांना मणका, मान, कंबर दुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दयनीय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
त्यामुळे नादुरुस्त झालेल्या या तिन्ही राज्यमार्गांच्या कामाबाबत बांधकाम विभागाने वेळीच कार्यवाही करावी. ३० एप्रिलपर्यंत संबंधित राज्यमार्गांच्या डांबरीकरणाला सुरुवात न करावी. तसे न झाल्यास १ मे रोजी सावंतवाडी येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे प्रदीप नाईक तसेच दीपक जाधव, संजय गावकर, कानू दळवी, प्रवीण दळवी आदींनी बांधकाम विभागाला दिला आहे.