देशी ‘गोवंश संवर्धन’ करणारी गोशाळा!, बारामतीत भारतातील पहिलाच प्रकल्प
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 28, 2025 17:08 IST2025-05-28T17:07:33+5:302025-05-28T17:08:04+5:30
गायीच्या दुधाची गुणवत्ता वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य, शेतकऱ्यांसाठी लाभदायक

देशी ‘गोवंश संवर्धन’ करणारी गोशाळा!, बारामतीत भारतातील पहिलाच प्रकल्प
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : बारामती गो शाळा प्रकल्प हा देशी गोवंशाच्या सुधारणा आणि संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्यामार्फत राबवला जातो आणि भारतातील पहिला देशी गोवंश सुधारणा प्रकल्प म्हणून ओळखला जातो.
बारामतीचा विकासाचे नियोजन, राजकीय इच्छाशक्ती, उद्योग, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. बारामती हे राज्यातील विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास हा दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेतृत्वामुळे घडला आहे. विविध विकासकामांचा दर्जा अत्यंत सुंदर आहे.
बारामती गो शाळा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश देशी गायींच्या जातींचे संवर्धन, त्यांच्या दुधाची गुणवत्ता वाढवणे, तसेच शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे वाण उपलब्ध करून देणे हा आहे. यासोबतच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून गो शाळांना आर्थिक साहाय्य, अनुदान आणि तांत्रिक मदत दिली जाते, जेणेकरून गोशाळा अधिक सक्षम आणि आधुनिक बनू शकतील.
हा प्रकल्प बारामती आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांसाठी आणि गोपालन व्यवसायासाठी एक आदर्श उदाहरण ठरतो आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागासाठी ‘नीरा-कऱ्हा स्थिरीकरण जोड प्रकल्प’ राबवून पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
गोशाळा प्रकल्पाची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये
देशी गोवंशाचे संवर्धन आणि सुधारणा
शेतकऱ्यांना दर्जेदार गोवंश उपलब्ध करून देणे, दुधाच्या उत्पादनात वाढ, शाश्वत शेतीला चालना
सेंटर ऑफ एक्सलेन्स
- देशातील पहिला अत्याधुनिक ‘सेंटर ऑफ एक्सलेन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड रोबोटिक ऑटोमेशन’ हा पथदर्शी प्रकल्प बारामतीत आहे.
- केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत बारामतीत शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन सुरू करण्यात आले आहे.
सामाजिक, आर्थिक उपक्रम
विविध समाज घटकांसाठी आर्थिक मदतीचे उपक्रम, जसे की मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लहान व्यावसायिकांना मदत. सार्वजनिक वाचनालय, सभागृह, अभ्यासिका यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
कृषी, सिंचनामध्ये बहारदार कामगिरी
- बारामती तालुका पूर्वी दुष्काळी होता, परंतु निरा डाव्या कालव्यामुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढले, त्यामुळे ऊस, गहू, मका, फळबाग यासारखी शेती फुलली आहे,
- साखर कारखाने, इथेनॉल निर्मिती, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला उत्पादन हे अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत,
- बारामतीमध्ये कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत.
विकास म्हणजे नेमका काय असतो? हे पाहण्यासाठी बारामतीला जावे, अशी प्रतिक्रिया कायमच दिली जाते. हे खरं आहे, याची प्रचिती आपल्याला बारामतीला भेट दिल्यानंतर येते. शरदचंद्र पवार यांचे नेतृत्वाखाली गेली चार दशके बारामतीचा चेहरा मोहरा बदलला आहे. येथील लोकांचा पवार यांच्यावर दृढ विश्वास असल्याने कधी काळी दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. कृषी, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात स्थानिकांना भक्कम रोजगार निर्मिती झाल्यामुळेच कोणत्याही प्रकल्पाला येथील जनता विरोध करत नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी बारामतीमध्ये जाऊन याची प्रचिती घ्यावी. - -व्हिक्टर डान्टस, संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, तथा संस्थापक अध्यक्ष व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ