वन्यप्राण्याची शिकार प्रकरणातील संशयितांना जामीन
By अनंत खं.जाधव | Updated: February 26, 2024 20:08 IST2024-02-26T20:08:35+5:302024-02-26T20:08:58+5:30
आंबोली हिरण्यकेशी परिसरात घडली होती घटना

वन्यप्राण्याची शिकार प्रकरणातील संशयितांना जामीन
सावंतवाडी: आंबोली येथे वन्यप्राण्याची शिकार प्रकरणातील सहा संशयित आरोपींची सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटी व शर्थीवर 50 हजारांचा जामिन मजूर केला आहे.आता त्याना आठवड्यातून दोन वेळा वन कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
आंबोली वनजगंल परिसरात वन्यप्राण्याची शिकार केल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणात एका कारसह बंदूक जप्त करण्यात आली होती तर सहा जणांना ताब्यात घेवून वनविभागाने गुन्हा दाखल केला होता. यात फरान समीर राजगुरू ( २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली ( ४२, रा. सावंतवाडी), सर्फराज बाबर खान (३४), रजा गुलजार खान (२३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी), अरबाज नजीर मकानदार ( २६, रा. माठेवाडा) आदींचा समावेश होता.
या सर्वांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 नुसार तसेच मनाई आदेश असताना हत्यारे घेऊन वनजमिनीत फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता प्रथम वनकोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती.
त्यानंतर संशयित आरोपींच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता या अर्जावर सुनावणी होऊन संशयित आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून या सर्वाना आठवड्यातून दोन वन कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.