महिला सक्षमीकरणासाठी जिल्ह्याला २५ कोटी : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:48 IST2019-01-17T18:46:57+5:302019-01-17T18:48:29+5:30
महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा. परंतु आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत आहे.असे मत राज्याचे गृह, राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. सिंधुदुर्गच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

पाडलोस येथे रस्त्याच्या भुमिपूजन प्रसगी बोलतना मंत्री दीपक केसरकर शेजारी रूपेश राउळ, राजू मुळीक, अशोक दळवी, सरपंच अक्षरा पाडलोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सावंतवाडी : महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा. परंतु आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत आहे.असे मत राज्याचे गृह, राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. सिंधुदुर्गच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.
पाडलोस-भाकरवाडी-रोणापाल रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, उपसरपंच महादेव गावडे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य बबन राणे, सातार्डा उपविभागप्रमुख उल्हास परब, मळेवाड विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, पाडलोस ग्रामपंचायत सदस्य रामा नाईक, गणपत पराडकर, लीना माधव, रुचिता करमळकर, पाडलोस युवासेना शाखा अधिकारी समीर नाईक, सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ते, माजी पंचायत समिती सदस्य बाळा शिरसाट, मळेवाड माजी उपसरपंच अर्जुन मुळीक, मडुरा शाखाप्रमुख श्रीकृष्ण भोगले, पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, दाजी राऊळ, श्रीधर परब, दिलीप गावडे, बाळा नाईक, राजन नाईक, विठ्ठल नाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, शेळीपालन, गाय-म्हैस दुध व्यवसाय, क्वॉयर काथ्या व्यवसायासाठी शंभर टक्के अनुदान देणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घ्या. शेतकरी सुखी व्हायला पाहिजे. नारळाच्या बागांमध्ये कशाप्रकारे उत्पन्न घ्यायचे यावर असणाऱ्या योजना सांगितल्या. तुमच्या प्रेमापोटीच महाराष्ट्राची जबाबदारी पेलत असल्याचे केसरकर यांनी सांगितले. गावामध्ये समृद्धी आली पाहिजे, लोकांजवळ पैसे आले पाहिजे.
तुम्हाला जो व्यवसाय करायचा असेल त्याला सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार. पर्यटकांना घरात आणावयाचे असल्यास ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. बांदा येथे भव्य असे प्रवेशद्वार बांधणार आहे, असे केसरकर म्हणाले. रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितलेल्या सर्व रस्त्यांसाठी निधी दिला जाईल. राजकारण फक्त निवडणुकीपुरतेच ठेवून नंतर पुन्हा एकत्र येणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
...तर मंत्रीपदाचे सार्थक होईल!
ज्या ठिकाणी शांतता असते तेथे समृद्धी येते आणि जेथे समृद्धी येते तेथे लक्ष्मी येते. ज्या दिवशी ही समृद्धी तुमच्या घरामध्ये येईल त्यावेळी तुम्ही मला आमदार केल्याचे अन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री केल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले असे मला वाटेल, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.