गाव करील ते राव काय करील !

By Admin | Updated: September 16, 2014 23:55 IST2014-09-16T21:42:30+5:302014-09-16T23:55:46+5:30

वाघोशी : आदर्श गाव संकल्पनेला ग्रामस्थांनी दिले मूर्त स्वरूप

What will the villagers do? | गाव करील ते राव काय करील !

गाव करील ते राव काय करील !

खंडाळा : आपलं गाव गड्या कसंही असलं तरी लईचं भारी ! असे प्रत्येकालाच वाटतं असतं. मात्र, तेच गाव वास्तवात सुंदर बनविण्यासाठी धडपडणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजणारी सापडतात. गावात विविध शासकीय योजनांबरोबर ग्रामस्वच्छता, सौरऊर्जा, वृक्षारोपण, जलसंधारण, तंटामुक्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक उपक्रम या विविध स्तरावर काटेकोर नियोजन करून कृती आराखडा तयार करून वाघोशी, ता. खंडाळा या गावाने आदर्श गाव निर्मितीच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी महाविद्यालय विद्यार्थी आणि सेवा संस्थेचेही सहकार्य घेण्यात आले आहे. गतवर्षी खंडाळा पंचायत समितीने आयोजित केलेल्या अभ्यासदौऱ्यातून प्रेरणा घेऊन वाघोशी गावाने आदर्शवत बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वप्रथम येथील प्राथमिक शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करीत शिक्षणाचा पाया मजबूत केला. त्यानंतर गेल्या दहा दिवसांत सातारा येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ग्रामीण अभ्यास शिबिर आयोजित करून गावच्या विकासाच्या व पुनर्रचनेचा संपूर्ण आराखडा तयार केला आहे. यासाठी या महाविद्यालयाचे प्राध्यापक पंकज दास व डॉ. मनीषा शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे सुक्ष्म नियोजन केले गेले. त्यानुसार सातारा येथील सेवा संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक बाबींवर उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी या संस्थेचे संचालक विपुल साळुंखे यांनी सर्वप्रथम गाव परिसरात वृक्षारोपण मोहीम हाती घेऊन पहिल्या टप्प्यात एक हजार झाडांचे वृक्षारोपण केले. हळूहळू ही संस्था वाढवत परिसरात वनीकरण उभारण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर जलसंधारण अंतर्गत ‘पाणी अडवा, पाणी साठवा’ योजना राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतरही पूरक योजना पूर्ण करण्यात येतील, असे नियोजन आहे. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच लक्ष्मण धायगुडे, कृती समितीचे अध्यक्ष अंकुश धायगुडे, सचिव गणेश धायगुडे यांनी विशेष प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

नाट्यछटांतून समाजप्रबोधन
दहा दिवसांच्या शिबिरातून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. विविध नाट्यछटांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले गेले. शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी अध्यापनाचे धडे देण्याबरोबरच मनोरंजक खेळ व मैदानी खेळही घेण्यात आले. रोज सायंकाळी महिला सबलीकरणासाठी उपक्रम राबवून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला गेला. त्यामुळे आदर्श गाव निर्मितीचा वाघोशी गावच्या प्रयत्नांना आता सेवा संस्थेचा हातभार लागल्याने सातारा जिल्ह्यातही राळेगणसिध्दी हिवरे बाजार सारखे गाव उभे करण्याची ग्रामस्थांची तयारी आहे.

Web Title: What will the villagers do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.