बलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी-ग्रामस्थांत समाधान :योजना सुरू राहणार - लोकमत इफेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 19:26 IST2019-01-18T19:25:31+5:302019-01-18T19:26:36+5:30
आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावांच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या होत्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले.

बलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी-ग्रामस्थांत समाधान :योजना सुरू राहणार - लोकमत इफेक्ट
आदर्की : आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावांच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या होत्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते पाणी मुळीकवाडी धरणात पोहोचल्याने जनावरांचा व चार गावांच्या पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात मुळीकवाडी धरण १९७२ मध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. या धरणावरून नांदल, मुळीकवाडी येथील पोटपाटाने जमीन ओलिताखाली आली होती. काही जमीन उपसा जलसिंचनामुळे ओलिताखाली आली होती.
नांदल, मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड या गावांत पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण पंधरा दिवसांपूर्वी आटल्याने पाणी पुरवठा योजना धोक्यात आली. यासंबंधी ‘लोकमत’ने ‘मुळीकवाडी धरण आटले; चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन बलकवडी कालव्यातून बिबी, मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते बिबी घाडगेवाडी येथील बंधारे भरून पाणी मुळीकवाडी धरणात पोहोचले आहे. आता पाणीसाठा होऊ लागल्याने चार-पाच गावांच्या जनावरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. तीस ते चाळीस टक्के पाणीसाठा झाल्यानंतर चार गावांच्या पाणी पुरवठा योजना पूर्ववत सुरू होऊन पाणी प्रश्न मिटणार आहे.
फलटण तालुक्यातील चार गावांची पाणी योजना सुरू ठेवण्यासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)