रेवंडे घाटात दगड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 17:25 IST2019-08-01T17:24:35+5:302019-08-01T17:25:15+5:30
साताऱ्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरड पडण्याचे सत्र सुरूच आहे. सातारा तालुक्यातील रेवंडे घाटात गुरुवारी सकाळी मोठा दगड रस्त्यावर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

रेवंडे घाटात दगड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प
शेंद्रे : साताऱ्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरड पडण्याचे सत्र सुरूच आहे. सातारा तालुक्यातील रेवंडे घाटात गुरुवारी सकाळी मोठा दगड रस्त्यावर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
साताऱ्यांतून बोगद्यामार्गे जाणारा रस्ता रेवंडे भागात जातो. अलीकडच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून इथे घाटरस्ता तयार करण्यात आला आहे. पश्चिम भागात यंदा झालेल्या संततधार पावसात वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. अशात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास रेवंडेतून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या सोनार खिंडीत मोठा दगड कोसळून रस्त्यावर आला, त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला.
त्यातून साताऱ्यांकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पंतप्रधान सडक योजनेतून अलीकडच्या काळात नव्याने झालेल्या घाटरस्त्यामुळे रेवंडेसह वावदरे, बेंडवाडी येथील ग्रामस्थांची सोय झाली आहे. घाट बंद झाल्यामुळे येथील लोकांना बारा किलोमीटरचा वळसा घालून राजापुरी, बोरणेमार्गे ठोसेघर रस्त्याने साताऱ्याला जावे लागणार आहे. रस्ता बंद झाल्यामुळे सर्वांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.