सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाने आणखी तीन जनावरांचा मृत्यू, आतापर्यंत १३२ पशुधन बाधित
By नितीन काळेल | Updated: September 14, 2022 18:36 IST2022-09-14T18:35:44+5:302022-09-14T18:36:19+5:30
पशुसंवर्धन विभागापुढेही लम्पीला रोखण्याचे आव्हान आहे.

सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाने आणखी तीन जनावरांचा मृत्यू, आतापर्यंत १३२ पशुधन बाधित
सातारा : जिल्ह्यात लम्पी त्वचा रोग जनावरांच्या संख्येत वाढ होत चालली असून आणखी तीन पशुधनाचा मृत्यू झाला. त्यामुळे लम्पीने मृत्यूमुखी पडणाऱ्या जनावरांचा आकडा पाचवर पोहोचला. तर आतापर्यंत १३२ जनावरांना लम्पी रोगाने गाठले आहे.
लंपी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. असे असले तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प असते. जिल्ह्यात सध्यस्थितीत जनावरांना आवश्यकतेनुसार लस आणि उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत ६५ जनावरे या रोगाने बाधित झाली होती. तर २० जनावरे रोगातून बरी झाली होती. त्याचबरोबर जिल्ह्यात प्रथमच कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथे एका बैलाचा लम्पीने मृत्यू झाला.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत लम्पी बाधित जनावरांचा आकडा ६५ होता. मात्र, मंगळवारी हाच आकडा १२३ तर बुधवारी १३२ पर्यंत पोहोचला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागापुढेही लम्पीला रोखण्याचे आव्हान आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत पाच जनावरांना रोगाने मृत्यू झाला आहे. यामधील तीन जनावरे बुधवारी दगावली. फलटण तालुक्यात शिंदेवाडी (आसू) आणि जिंतीत जनावरे दगावली. त्याचबरोबर खटाव तालुक्यातील मानेवाडीत एका जनावराचा मृत्यू झाला.
२३ हजार जनावरांना लसीकरण...
जिल्ह्यात लंपी बाधित जनावरांचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमिवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातील जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत २३ हजार ५०० जनावरांना लसीकरण झाले आहे.