आयुष्यमान कार्डसाठी रेशन मिळण्याची अट जाचक! पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:25 IST2025-12-29T15:25:09+5:302025-12-29T15:25:32+5:30
सध्या आयुष्यमान कार्ड महाईसेवा केंद्रांमार्फत काढून दिले जात आहे. परंतु, हे कार्ड फक्त ज्या नागरिकांना रेशनिंग मिळते, त्यांनाच दिले जात असल्याचे चित्र आहे...

आयुष्यमान कार्डसाठी रेशन मिळण्याची अट जाचक! पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात
सातारा : खासगी रुग्णालयांतील उपचार खर्च दिवसेंदिवस वाढत असून, सामान्य नागरिकांसाठी आजारावर उपचार घेणे अक्षरशः आवाक्याबाहेर गेले आहे. हे वास्तव ओळखून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ‘आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार खासगी रुग्णालयांमध्ये मिळण्याची सुविधा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्यमान कार्ड काढताना येणाऱ्या जाचक अटींमुळे अनेक नागरिक हतबल झाले आहेत.
सध्या आयुष्यमान कार्ड महाईसेवा केंद्रांमार्फत काढून दिले जात आहे. परंतु, हे कार्ड फक्त ज्या नागरिकांना रेशनिंग मिळते, त्यांनाच दिले जात असल्याचे चित्र आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेकांकडे वैध रेशन कार्ड असूनही, तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती, नावातील तफावत किंवा ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी यामुळे आयुष्यमान कार्ड काढता येत नाही. परिणामी, पात्र असूनही अनेक कुटुंबे या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहत आहेत.
पूर्वी रेशनिंगची अट होती, परंतु आता अशी अट नाही. तहसीलदारांनी सर्व रेशनिंग ऑनलाइन करून बारा अंकी नंबर द्यावेत. तरच, सर्वांना आयुष्यमानचा लाभ घेता येईल.
डॉ. देविदास बागल, समन्वयक, आयुष्यमान भारत योजना, सातारा.