Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा !

By नितीन काळेल | Updated: June 9, 2025 13:44 IST2025-06-09T13:42:42+5:302025-06-09T13:44:12+5:30

तिसऱ्या संमेलनापासून वारसा : जिल्ह्यातील ७ वा साहित्य सोहळा

Satara 1905 Sahitya Sammelan set a new precedent for every year | Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा !

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा !

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्ह्याला १६ व्या, १७ व्या शतकापासून साहित्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नामांकित साहित्यिक होऊन गेले आहेत, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनातही साताऱ्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या ९९ व्या संमेलनाचा मानही साताऱ्याला मिळालेला आहे. त्यामुळे सातारा शहरातील हे चाैथे, तर जिल्ह्यातील ७ वे संमेलन ठरणार आहे. विशेष म्हणजे १९०५ ला साताऱ्यात अखिल भारतीयचे तिसरे संमेलन झाले. त्यानंतरच दरवर्षीच संमेलने पार पडू लागली.

सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व आहे, तसेच जिल्हा साहित्यिकांचाही आहे. या भूमीतूनच अनेक नामांकित साहित्यिक घडले, तसेच त्यांनी साहित्यातून विचारांची पेरणीही केली. त्यामुळे जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने अधिक संख्येने होत आहेत. यासाठी सातारकरांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्यासारखाच आहे.

कारण, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या साहित्य संमेलनांना सुरुवात झाली. १८७८ आणि १८८५ मध्ये पुण्यात संमेलने पार पडली. त्यानंतर १९०५ मध्ये तिसरे साहित्य संमेलन साताऱ्यात झाले. जिल्ह्यातील हे पहिले संमेलन ठरले; पण यानंतरच दरवर्षी साहित्य संमेलन घेण्याचा पायंडा पडला. १९०५ च्या संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात वकील रघुनाथ पांडुरंग तथा दादासाहेब करंदीकर होते. ते लोकमान्य टिळक यांचे जवळचे सहकारी होते. यानंतर तब्बल ५७ वर्षांनी १९६२ मध्ये साताऱ्यात ४४ वे संमेलन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि साहित्यिक नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ अध्यक्ष होते. जिल्ह्यातील हे दुसरे संमेलन ठरले.

१९६२ नंतर १३ वर्षांनी १९७५ मध्ये कऱ्हाडमध्ये ५१ वे साहित्य संमेलन झाले. जिल्ह्यातील तिसरे संमेलन होते. प्रख्यात साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळचे केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण होते. देशातील आणीबाणीच्या काळात संमेलन झाल्याने जोरदार चर्चा झाली होती. यानंतर जिल्ह्यात साहित्य संमेलन होण्यासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागली.

१९९३ मध्ये ६६ वे संमेलन झाले. सातारा शहरातील तिसरे, तर जिल्ह्यातील चाैथे संमेलन होते. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विद्याधर गोखले संमेलनाचे अध्यक्ष, तर मंत्री अभयसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते. यानंतर १० वर्षांनी २००३ मध्ये कऱ्हाडमध्ये ७६ वे आणि जिल्ह्यातील पाचवे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष भेंडे होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे संमेलनाचे उद्घाटक होते.

महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षाविना..

२००९ मध्ये सातारा आणि कऱ्हाडनंतर जिल्ह्यातीलच महाबळेश्वरमध्ये प्रथमच संमेलन झाले. हे ऐकून ८२ वे संमेलन होते. जिल्ह्यातील सहावे ठरले. अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव होते; पण त्यांच्या एका पुस्तकामुळे वाद वाढला होता. त्यामुळे यादव यांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. अध्यक्षाविना संमेलन पार पडले. यानंतर जिल्ह्यात १६ वर्षांनी संमेलन होत आहे. हे जिल्ह्यातील ७ वे आणि साताऱ्यातील चाैथे संमेलन ठरणार आहे.

१७ अध्यक्ष सातारा जिल्ह्यातील..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आतापर्यंत ९८ पार पडली आहेत. यामध्ये १७ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सातारा जिल्ह्याने (विभागणीपूर्वीचाही जिल्हा धरून) भूषविले आहे. ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे.

साताऱ्यातील संमेलन आदर्शवत ठरेल..

साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साताऱ्यात संमेलन व्हावे या उद्देशानेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना करण्यात आली होती. गेली १२ वर्षे सतत साताऱ्यात संमेलन होण्यासाठी मागणी करत होतो. अखेर महामंडळाने मागणी मान्य केली. सातारा शहराला ३२ वर्षांनंतर पुन्हा संमेलन मिळवून देण्यात योगदान देऊ शकलो याचा अत्यंत आनंद आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सातारकरांच्या पाठबळावर राज्यात नाही तर देशात आदर्शवत ठरेल, असे संमेलन पार पाडून दाखवू. - विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ 
 

Web Title: Satara 1905 Sahitya Sammelan set a new precedent for every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.