सातारा : सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात करावा लागणार आहे. बँकेच्या भागभांडवल, ठेवी, कर्ज, सुयोग्य गुंतवणूक व कर्ज वसुली आदींमध्ये झालेली वाढ यामुळे बँकेला अहवाल वर्षात विक्रमी नफा झालेला आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक आमदार शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
रामराजे म्हणाले, बँक स्थापनेपासून सतत नफ्यात आहे व ऑडिट अ वर्गात आहे. बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळविला आहे. सध्या आयटीचे युग असल्याने बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या बँकेमध्ये भविष्यात अधिक प्रमाणात आधुनिकीकरणाचा वापर करून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल. सभासद, मतदार जागृत होत आहेत त्यामुळे चांगले बदल होत आहेत. बँक आपणास सक्षम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन होत असून सभासदांनी या सभेत अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याचा बँकेचे संचालक मंडळ जरुर विचार करील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे अपेक्षित असून थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होणे आवश्यक आहे. आपली बँक राज्यातच नव्हे, तर देशातच नावलौकिक प्राप्त बँक आहे.
या सभेला संचालक दत्तात्रय ढमाळ, शिवरूपराजे खर्डेकर, राजेश पाटील-वाठारकर, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुनराव खाडे, सुरेखा पाटील, कांचन साळुंखे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर आदी ऑनलाइन उपस्थित होते.
बँकेला ४६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा : शिवेंद्रसिंहराजे
अहवाल सालात बँकेकडे रुपये ७ हजार ६२२ कोटी २८ लाखांच्या ठेवी असून एकूण कर्ज वितरण रुपये ५ हजार २४५ कोटी १७ लाख आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १२ हजार ८६७ कोटी ४५ लाख आहे. सन २०१९-२० या सालामध्ये बँकेस करपूर्व नफा रुपये ८५ कोटी ३१ लाख झालेला असून सर्व तरतुदीनंतर रुपये ४६ कोटी निव्वळ नफा झालेला आहे.
फोटो ओळ : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शनिवारी झालेल्या वार्षिक सभेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.