'ठाकरें'च्या तोंडी आता 'राऊतां'ची भाषा, मंत्री शंभूराज देसाईंची टीका
By प्रमोद सुकरे | Published: July 12, 2023 06:13 PM2023-07-12T18:13:01+5:302023-07-12T18:14:23+5:30
अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार
![Now Sanjay Raut's language in the mouth of Uddhav Thackeray, Criticism of Minister Shambhuraj Desa | 'ठाकरें'च्या तोंडी आता 'राऊतां'ची भाषा, मंत्री शंभूराज देसाईंची टीका Now Sanjay Raut's language in the mouth of Uddhav Thackeray, Criticism of Minister Shambhuraj Desa | 'ठाकरें'च्या तोंडी आता 'राऊतां'ची भाषा, मंत्री शंभूराज देसाईंची टीका](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/sanjay-udhav-desai_2023071048411.jpg)
'ठाकरें'च्या तोंडी आता 'राऊतां'ची भाषा, मंत्री शंभूराज देसाईंची टीका
कराड : आम्ही सगळे बाजूला गेल्यापासून खासदार संजय राऊतचउद्धव ठाकरे यांच्याबरोबर जास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या कानावर सध्या राऊतांचीच भाषा जास्त पडत आहे. साहजिकच त्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या तोंडी राऊतांची भाषा ऐकायला मिळत आहे अशी टिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ठाकरेंनी केलेला 'कलंक' हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा आहे म्हणूनच लोकांच्यातून तीव्र भावना उमटत असल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वापरलेल्या ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी यांना छेडले असता ते बोलत होते.
देसाई म्हणाले, "उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत. मात्र, संजय राऊत जवळ असल्याने त्यांच्या सवयीचा परिणाम ठाकरेंवर बहुदा झाला असावा. त्यातूनच ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलले असावेत. आता ॲक्शनला रिॲक्शन येत आहे. जनतेतून यावर तीव्र संताप उमटत आहेत.
उद्धव ठाकरेंची यापूर्वीची भाषणे आम्ही ऐकलेली आहेत. एक संयमी आणि शांत वक्तृत्व उद्धव ठाकरेंचे असायचे. परंतु गेल्या वर्ष भरात आम्ही जी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारली. तेव्हापासून त्यांची भाषाशैली बदलत राहिली. आता महिना-दोन महिन्यामध्ये तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामध्ये एक वेगळेपणाच दिसतोय. याचे कारण संजय राऊतच आहेत. तेच त्यांच्या सतत जवळ असतात. सवयीचा परिणाम होतोच. राऊत जी भाषा बोलतात, जे शब्द वापरतात. ते शब्द उद्धव ठाकरेंच्या कानावर पडत असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडून फडणवीस यांच्याबद्दल एक शब्द गेला असेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत. ते व्यक्तिमत्व राज्याला पुढे घेऊन जाणारे आहे. फडणवीस हे उत्कृष्ट संसद पट्टू आहेत. अशा एका अभ्यासू आणि अनुभवी राज्याला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाबाबत कलंक हा शब्द प्रयोग उद्धव ठाकरे यांच्याकडून होणे हे महाराष्ट्रातील कुणालाच रुचलेले नाही. असेही देसाई म्हणाले.
अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार
सोमवारपासून मंत्रिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच मत्रीमंडळ विस्तार व खाते वाटप करतील. मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटप पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे ही देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.