गरज समुपदेशनाची...मुलांसह पालकांनाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST2021-09-05T04:43:41+5:302021-09-05T04:43:41+5:30
मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सतत व्हिडीओ गेम खेळणे हे जिवावर बेतू शकते. पब्जी गेमच्या आहारी गेल्यामुळे ...

गरज समुपदेशनाची...मुलांसह पालकांनाही!
मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सतत व्हिडीओ गेम खेळणे हे जिवावर बेतू शकते. पब्जी गेमच्या आहारी गेल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सतत मोबाईल, संगणकावर गेम खेळल्याने मानसिक संतुलन बिघडते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कृत्रिम आनंद देणाऱ्या पब्जीसारख्या घातक गेमपासून लांब राहून मैदानावर खेळायला प्राधान्य द्यावे.
ऑनलाईन गेम खेळण्याचं सगळ्याच वयोगटांमध्ये दिसून येतं. मात्र लहान मुलं आणि तरुणाई याच्या अधिकच आहारी गेल्याचं चित्र आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन गेम खेळण्यात थ्रिल वाटत असल्याचं तरुणाईचं म्हणणं आहे. त्याचसोबत उपलब्ध असणाऱ्या गेमच्या व्हरायटीज आणि त्याचे दररोज येणारे अपडेट्स यांमुळे आभासी विश्वात तरुणाई सतत रमलेली असते.
कोवळ्या वयातली मुलं पटकन या व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे मुलांची यापासून जपणूक करण्याची जबाबदारी पालकांवरही आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
ऑनलाईन गेमचे दुष्परिणाम
१. महत्त्वाच्या दैनंदिन कृतींपेक्षा ती व्यक्ती गेम खेळण्यालाच जास्त पसंती देते
किती वेळ गेम खेळावी, यावर त्या व्यक्तीचं नियंत्रण राहत नाही
२. आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊनही ती व्यक्ती गेम खेळणं सोडत नाही
३. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आयुष्यातील इतर भागांवर गेम खेळण्याचा परिणाम होत असल्यास त्याला व्यसन म्हणता येईल
४. ही लक्षणं किमान एक वर्षांपासून दिसत असल्यास त्याला मानसिक आजार म्हणता येईल
पालक काय करू शकतात?
१. तंबाखू, दारूसारखंच इंटरनेटचा अतिवापर हे व्यसन असल्याचं पालकांनी लक्षात घ्यावं
२. मोबाईल किंवा लॅपटॉपवर शिक्षण घेत असताना मुले नक्की काय करतात, हे पाहणं गरजेचं
३. मुलांना व्यायामाची आवड लावावी
४. मुले एकलकोंडी होत नाहीत ना..हे लक्षात घेऊन पालकांनी त्यांना वेळ द्यावा
तज्ज्ञ काय म्हणतात?
कोरोना लॉकडाऊनमुळे घराघरात इंटरनेटचा वापर जास्त प्रमाणात वाढला. इंटरनेटवर मर्यादेपलीकडे अवलंबित्व वाढलेलं आहे. मुले मैदानात खेळत नाहीत आणि पुस्तकही हातात धरत नाहीत. मात्र मोबाईलवर गेम खेळण्यात आपला वेळ घालवतात, हे घातक आहे. मुलांना परिस्थितीचे भान राहावे, जबाबदारी कळावी, यासाठी पालकांनी सजग असणे गरजेचे आहे.
डॉ. हमीद दाभोलकर, मनोविकार तज्ज्ञ