दागिने चोरीस गेलेल्याची तक्रार दीड महिन्यानंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:55 IST2020-02-11T13:53:34+5:302020-02-11T13:55:08+5:30
ठाण्यातील महिला अभियांत्याने दीड महिन्यानंतर साडेचार लाखांचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. ही घटना २३ डिसेंबर २०१९ रोजी साताऱ्यातील अजंठा चौकात घडली होती. याप्रकरणी अज्ञातावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दागिने चोरीस गेलेल्याची तक्रार दीड महिन्यानंतर
सातारा : ठाण्यातील महिला अभियांत्याने दीड महिन्यानंतर साडेचार लाखांचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. ही घटना २३ डिसेंबर २०१९ रोजी साताऱ्यातील अजंठा चौकात घडली होती. याप्रकरणी अज्ञातावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अरूंधती किशोर गुजर (वय ५९, रा. ठाणे, मुंबई) या अभियांत्या आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये त्या बेंगलोरहून खासगी बसने मुंबईला निघाल्या होत्या. साताऱ्यातील अजंठा चौकात काही वेळ बस थांबली होती.
यावेळी अज्ञाताने त्याच्या बॅगमधील छोटी पर्स चोरून नेली. त्या पर्समध्ये मंगळसूत्र, पेंन्डन्ट, बांगड्या असे ३ लाख ८१ हजारांचे १२७ ग्रॅमचे सोने होते. हा प्रकार काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी मुंबईमधील सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हा प्रकार साताऱ्यात घडल्यामुळे मुंबई पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे. ही घटना घडून बरेच दिवस उलटले असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.