केवळ जल्लोषासाठीच लाखोंचा चुराडा!
By Admin | Updated: September 15, 2014 00:07 IST2014-09-14T23:36:09+5:302014-09-15T00:07:39+5:30
डॉल्बीची युवकांमध्ये ‘क्रेझ’ : इतका खर्च कशासाठी? नागरिकांतून सवाल

केवळ जल्लोषासाठीच लाखोंचा चुराडा!
सचिन काकडे - सातारा -त्यानं कुठणं आणलायं रे... याचा कितीचा? त्याचा हॅँगिंग आहे का?...आपण पण लावूया मग थरावर थर... केवळ अशा भानगडींमुळे युवकांमध्ये डॉल्बीची क्रेझ वाढली आहे. यासाठी मग लाखोंचा चुराडा झाला तरी चालेल; पण धमाका झालाच पाहिजे, अशीच काही युवा कार्यकर्त्यांची धारणा झाली आहे. केवळ ‘दणदणाटा’साठी इतका खर्च कशासाठी? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात डॉल्बीचा आवाज निवडक शहरांमध्येच घुमत होता. हळुहळू त्याचे आकर्षण वाढत गेले आणि व्याप्तीही वाढत गेली. परिणामी ग्रामीण व शहरी भागांत लग्न कार्यापासून ते सर्व धार्मिक कार्यात डॉल्बीची मागणी वाढू लागली. हे पाहून डॉल्बी व्यावसायिकांची संख्याही जिल्ह्यात वाढू लागली. जिल्ह्यात लहान-मोठे जवळपास २०० डॉल्बी व्यावसायिक आहेत. ही साउंड सिस्टिम अत्यंत महागडी असल्याने उत्सवकाळात डॉल्बीची सुपारी ही तितकीच मोठी असते. २५ हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत डॉल्बीची सुपारी घेतली जाते. काही वेळेस पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरातूनही डॉल्बी सिस्टिम आणली जाते.
गणेशोत्सव काळात या डॉल्बीला प्रचंड मागणी असते. मंडळांचे ज्युनिअर कायकर्ते सिनिअर कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकत नसल्याचा सूर ‘लोकमत’ व्यासपीठात उमटला होता. ज्युनिअर कार्यकर्त्यांवर सिनिअर कार्यकर्त्यांची मदार अवलंबून असल्याने त्यांना खूश ठेवण्यासाठीच वरिष्ठांना झुकावे लागत आहे. मात्र, सातारा येथे गणेशोत्सवात घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी फक्त मोठ्या आवाजासाठी लाखोंचा चुराडा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. डॉल्बीला विरोध नाही; परंतु त्याच्या आवाजावर मर्यादा असायली हवी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
डॉल्बीवर जो-तो आपले भान विसरून थिरकत असतो. ही गरज पारंपरिक वाद्येही भागवू शकतात, मग इतरांच्या जीवाशी खेळ कशासाठी करायचा, असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
रोजगाराची चिंता निरर्थक
आपण जर थोडासा विचार केला तर जाणवेल की, डॉल्बीमुळे केवळ एकाच व्यावसायिकास रोजगार मिळतो; मात्र तीच सुपारी जर पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या व्यावसायिकांना मिळाली तर अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. बॅँड-बाजा, ढोल पथकात एक नव्हे तर दहा-पंधरा जण काम करीत असतात. या वाद्यांचा आवाज जरी कमी असला तरी श्रवणीय आहे. याचे सर्वांनीच चिंतन करणे गरजचे आहे, असे असताना रोजगाराची चिंता करणे मग निरर्थकच म्हणावे लागेल.