Satara: वन मजुरांचे प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण
By प्रगती पाटील | Updated: December 4, 2023 17:42 IST2023-12-04T17:42:13+5:302023-12-04T17:42:25+5:30
सातारा : महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयात फेर बदल करून सुधारित शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी ...

Satara: वन मजुरांचे प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण
सातारा : महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयात फेर बदल करून सुधारित शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी तसेच वनमजुरांना शासन सेवेत कायम करण्यासाठी मंत्रालयीन दालनातील फाईल मंजुरी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वनमजूर वन कामगार वनपाल आणि जनरल युनियन यांच्यावतीने उपवनसंरक्षक कार्यालय समोर युनियन अध्यक्ष रामचंद्र भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत उपवन संरक्षक कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वन विभागात १९८९ ते २०२३ या कालावधीत कार्यरत असणाऱ्या बऱ्याचशा रोजंदारी वनमजुरांची माहिती कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येत नाही. शासनाच्या चुकीच्या घटनाबाह्य शासन निर्णयामुळे वनमजुरांची माहिती शासनाला संबंधित कार्यालयामार्फत चुकीच्या पद्धतीने सादर केली जाते. त्यामुळे अनेक वनमजुरांवर अन्याय आजही सुरूच आहे. वर्षातून दोन ते तीन वेळा मिळणाऱ्या तुटपुंजा पगारावर शासन सेवेत कायम होण्याच्या अपेक्षित वयाच्या अटी निघून गेल्या तरी मजूर काम करत आहेत.
दरम्यान वन विभागात हंगामी कामासाठी रोजंदारी वनमजुरांची आवश्यकता असल्यास हंगामी कामाशिवाय इतर कोणत्याही कामावर बारमाही मजूर घेण्यात यावेत. हंगामी कामासाठी घ्यावयाच्या मजुरांच्या सेवा कोणत्याही परिस्थितीत तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी लागू करण्यात येऊ नये असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.