सातारा जिल्ह्यात ५.३१ लाख जणांचे ई-केवायसी बाकी, अन्यथा रेशन होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:42 IST2025-02-04T13:41:42+5:302025-02-04T13:42:03+5:30

जिल्हा पुरवठा विभागाकडून शिबिरांचे नियोजन

E KYC of 5 lakh people in Satara district pending, ration will be stopped | सातारा जिल्ह्यात ५.३१ लाख जणांचे ई-केवायसी बाकी, अन्यथा रेशन होणार बंद

सातारा जिल्ह्यात ५.३१ लाख जणांचे ई-केवायसी बाकी, अन्यथा रेशन होणार बंद

सातारा : धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांचे शंभर टक्के ई-केवायसी होणे गरजेचे आहे. परंतु, शासनाने वेळोवेळ मुदत वाढवून देऊनही ग्राहक ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. आता राज्य शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. मुदतीत केवायसी न केल्यास रेशन बंद होऊ शकते. अद्याप ५ लाख ३१ हजार जणांचे ई-केवासी बाकी आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटाच्या लाभार्थीचे शिधापत्रिकेत संलग्न असलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे, शिधापत्रिकेत नमूद व्यक्ती तीच आहे याची खात्री करण्यासाठी तसेच १०० टक्के ई-केवायसी प्रमाणीकरण होण्याकरिता लाभार्थींना त्यांच्या स्वगृही न जाता कोणत्याही रास्तभाव दुकानातून ई-केवायसी करण्याची सुविधा ई-पॉस मशीनवर उपलब्ध करून दिली आहे.

ज्या लाभार्थीचे ई-केवायसी प्रलंबित आहे, अशा सर्वांचे १५ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावरून सर्व तालुका कार्यालयांना रास्तभाव दुकान स्तरावर कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अन्यथा रेशन होणार बंद

शासनाने वेळोवेळी मुदत देऊनही ही बाब गंभीर्याने घेतली नाही. आता शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. शासनाचे एकूण १७ लाख ६१ हजार ५७२ बाकी आहेत. यापैकी १२ लाख ३० हजार ५६२ जणांची ई-केवायसी झाली आहेत तर अद्याप ५ लाख ३१ हजार १० जणांची अद्याप बाकी आहे. मुदतीत ई-केवायसी न झाल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

जेवढ्यांचे आधारकार्ड तेवढ्यांचे मिळणार धान्य

ई-केवायसी करण्यासाठी ग्राहकांना गावातील रेशन दुकानातच संपर्क साधावा लागणार आहे. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. जितक्या सदस्यांचे आधारकार्ड सादर झाले, तितक्याच सदस्यांचे रेशन कार्डवर उपलब्ध होणार आहे. ही प्रक्रिया गावपातळीवर दुकानदार पार पाडणार आहेत.

ज्या लाभार्थींनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी स्वतःचे आधार कार्ड व शिधापत्रिका घेऊन जवळच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. - वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा

Web Title: E KYC of 5 lakh people in Satara district pending, ration will be stopped